एकीकडे मुंबईत महापौर नेमण्यासाठी भाजपकडून हालचाली सुरू असताना आता एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई महापालिकेत भाजप मोठी खेळी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इथं मनसेकडून भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येत भाजपविरोधात निवडणूक लढवली होती.
advertisement
आता ठाकरे बंधूंच्या युतीत फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनसेचे नगरसेवक भाजपला पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर येत आहे. आता हा निर्णय राज ठाकरेंचा आहे की नगरसेवकांनी स्थानिक पातळीवर स्वत:हून घेतला? याबाबतची माहिती गुलदस्त्यात आहे. मात्र ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली, त्याच भाजपला मनसेचे नगरसेवक पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मुंबईत ठाकरे बंधूंनी एकत्र निवडणूक लढवली होती. ज्यात शिवसेना ठाकरे गटाला ६५ जागा मिळाल्या होत्या. तर मनसेला ६ जागा मिळाल्या होत्या. भाजपनंतर ठाकरे गट मुंबईत दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यापाठोपाठ शिवसेना शिंदे गटाने उत्तम कामगिरी करत २९ नगरसेवक निवडून आणले. काँग्रेसनं देखील २४ नगरसेवक निवडून आणत मुंबई महापालिकेतील आपली ताकद दाखवून दिली आहे.
भाजपला मनसेची साथ का पाहिजे?
सध्याच्या घडीला महायुतीत भाजपकडे ८९, शिवसेना शिंदे गटाकडे २९ आणि अजित पवार गटाकडे ३ नगरसेवक आहेत. सगळ्यांची बेरीज केली तर १२१ इतकही होते. मुंबई महापालिकेत बहुमताचा आकडा ११४ इतका आहे. महायुतीकडे स्पष्ट बहुमत असताना भाजपला मनसेची साथ का हवी आहे? असा प्रश्न आता निर्माण होताना दिसत आहे.
