पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर गॅसचा टँकर पलटी झाल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. यामुळे वाहनधारकांसह प्रवाशांना 32 तास मनस्ताप सहन करावा लागला होता. या मार्गावरील वाहतूक कोंडी ही नेहमीची झाली आहे. दरम्यान विक एंड आणि उद्या होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर काही काळासाठी ब्लॉक घेऊन ट्रॅफिक डायव्हर्ट करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
advertisement
शनिवारपासूनच एक्सप्रेस वेवर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर खासगी वाहने, बस, लक्झरी कोच, तसेच मालवाहू वाहनांची संख्या वाढली आहे. अनेक नागरिक विक एंडच्या निमित्ताने पुणे, लोणावळा, खंडाळा आणि आसपासच्या पर्यटनस्थळी जाताना पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर उद्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी गावाकडे जाणाऱ्या मतदारांची गर्दीही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. यामुळे बोरघाट, खंडाळा घाट, तसेच अडोशी आणि खोपोली परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
कशी करणार वाहतूक कोंडी कमी?
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महामार्ग पोलिस आणि वाहतूक शाखेने संयुक्तरित्या विशेष नियोजन केले आहे. त्यानुसार, काही वेळासाठी मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर ब्लॉक घेऊन पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांना प्राधान्य दिले जाणार आहे. आवश्यकतेनुसार वाहतूक अन्य पर्यायी मार्गांवर वळवण्यात येणार असून, प्रवाशांना वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सूचनांचे पालन करा
दरम्यान, एक्सप्रेस वेवर अपघात टाळण्यासाठी गतीमर्यादेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गर्दीच्या काळात लेन बदलणे, अचानक ब्रेक लावणे किंवा धोकादायक ओव्हरटेक टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, आपत्कालीन परिस्थितीसाठी क्रेन, रुग्णवाहिका आणि पेट्रोलिंग वाहनांची संख्या वाढवण्यात आली आहे.
गर्दीच्या वेळा टाळण्याचे आवाहन
वाहतूक नियंत्रणासाठी सीसीटीव्ही आणि ड्रोनद्वारेही निरीक्षण ठेवण्यात येत आहे. प्रवाशांनी प्रवासापूर्वी वाहतूक अपडेट्स तपासूनच मार्ग निवडावा, तसेच शक्य असल्यास प्रवासाची वेळ बदलून गर्दी टाळावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
घाई न करता शिस्तीत वाहने चालवावी, महामार्ग पोलिसांचे आवाहन
सध्या मुंबई आणि पुणे अशा दोन्ही मार्गांवरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. विकएन्डमुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी पाहायला मिळत आहे. वाहतूक पोलीस सध्या तैनात असून टप्प्याटप्प्याने वाहने पुढे सोडली जात आहेत. चालकांनी घाई न करता शिस्तीत वाहने चालवावीत, असे आवाहन बोरघाट महामार्ग पोलिसांनी केले आहे.
हे ही वाचा :
