मुंबईतील सायन, प्रतीक्षा नगर, विलेपार्ले, अंधेरी, गोरेगाव, भांडुप आणि विक्रोळीसह अनेक भागात पाण्याचा कमी दाबाने पुरवठा किंवा अपुरा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत विविध वॉर्डमधील नागरिक आणि माजी नगरसेवकांकडून कमी पाणीपुरवठ्याच्या तक्रारी येत आहेत. मात्र, पाईपलाईन बाबत किंवा पाईपलाईन लीकेजची कोणतीही तक्रार नाही, असे बीएमसीच्या जल विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
advertisement
Weather Alert: मुंबई-ठाण्यात पाऊस रिटर्न! कोकणात धो धो कोसळणार, 48 तासांसाठी अलर्ट
लोकप्रतिनिधींच्या तक्रारी
गेल्या काही दिवासांपासून गोरेगाव पूर्वेतील गोकुळधाम परिसरात पाण्याचा पुरवठा कमी दाबाने होत आहे. याबाबत स्थानिकांनी भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविका प्रीती साटम यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर त्यांनी देखील बीएमसी अधिकाऱ्यांकडे अखंड पाणीपुरवठ्याच्या मागणीचे निवेदन दिले आहे. तर जोगेश्वरी पूर्व भागातील आमदार बाळा नर यांनी पूर्व वॉर्डच्या सहाय्यक आयुक्तांची भेट घेऊन पाणी समस्येबाबत तक्रार केली. तर भाजपचे माजी नगरसेवक अभिजित सामंत यांनी देखील अंधेरी पूर्वेतील पाणीपुरवठ्याबाबत तक्रार केली.
पाण्यातून दुर्गंधी
दहिसर पूर्वेकडील काही भागातून पाणीपुरवठ्यातूनही दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारी आहेत. गेल्या काही दिवासांपासून ही समस्या असून पिण्यासाठीचे पाणी मिळवण्यासाठी सुरुवातीला 5-6 मिनिटे पाणी सोडून द्यावे लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पाणीपुरवठा वाढवला
नागरिकांच्या तक्रारींनंतर पाणीपुरवठा 4000 एमएलडीवरून 4160 एमएलडी प्रतिदिन करण्यात आला आहे. ऑक्टोबर महिना, दिवाळीचा हंगाम आणि स्वच्छता आणि इतर कारणांसाठी पाण्याचा वापर वाढला आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. अंतर्गत पाण्याच्या पाईपलाईनमध्ये समस्या असेल तर अभियांत्रिकी विभागाचे अभियंते याबाबत अनेक भागांत तपासणी करत आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
