मुंबईतील नेस्को एक्झबिशन सेंटरमध्ये हा कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचबरोबर राज्यमंत्री मंडळातील सर्व मंत्री या कार्यक्रमास उपस्थित होते. मुंबईतील या विकास प्रकल्पांमुळे मुंबईकरांना मोठा फायदा होणार आहे. त्याच बरोबर मुंबई शहर वेगवान होणार आहे. या विकास प्रकल्पांसाठी 29,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
advertisement
कोणत्या विकासकामाचं लोकार्पण:
ठाणे बोरीवली दुहेरी भुयारी मार्ग, 16,600 कोटींचा प्रकल्प यावेळी लोकार्पण करण्यात आलं. हा एक ट्वीन टनल स्वरूपाचा प्रकल्प असणार आहे. या बोगद्याची लांबी जवळपास 11.8 किमी असणार आहे. दोन्ही बोगद्यांमधील जमिनीलगतचे सुरक्षित अंतर हे 13.5 मीटर असून दोन्ही बोगदे प्रत्येकी 2 मार्गिका + 1 आपत्कालीन मार्गिकेचे असतील. ठाणे ते बोरिवली प्रवास 12 मिनिटांत यामुळे शक्य होणार आहे.
मुंबईला जगाची आर्थिक राजधानी बनवण्याचं स्वप्न -मोदी
नरेंद्र मोदींनी मराठीमधून उपस्थितांना संबोधित करण्यास सुरूवात केली. "येथील 30 हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन होत आहे. आगामी काळात मुंबईला अधिक गतीमान करण्यासाठी या प्रकल्पांचा फायदा होणार आहे. तिसऱ्यांदा लोकांनी आमचं स्वागत केलं आहे, एनडीए सरकारचं स्थिरता देऊ शकते हे लोकांना माहिती आहे. तिसऱ्या टर्ममध्ये एनडीए सरकार तीन पटीने अधिक काम करणार आहे." असे पंतप्रधान म्हणाले. " महाराष्ट्राकडे गौरवशाली इतिहास आहे, शक्तीशाली वर्तमान आणि समृद्ध भविष्याचे स्वप्न आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, त्यास जगाची आर्थिक कॅपिटल बनवण्याचे माझं स्वप्न आहे. " असं म्हणत मोदींनी उपस्थितांची मने जिंकली.
