मुंबई-नाशिक महामार्गावरील माजिवडा ते वडपे या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) यांच्या माध्यमातून सुरू आहे. ठाणे खाडीवर उभारलेला जुना साकेत पूल केवळ दोन पदरी असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत असे. विशेषतः सकाळी कार्यालयीन वेळेत आणि रात्री अवजड वाहनांची वर्दळ वाढल्याने वाहनचालकांना दीर्घकाळ अडकून पडावे लागत होते. पावसाळ्यात पुलावर खड्डे पडल्याने परिस्थिती अधिक बिकट होत असे आणि त्याचा परिणाम ठाणे शहरातील अंतर्गत वाहतुकीवरही होत होता.
advertisement
Mumbai: लोकलच्या गर्दीतून सूटका! आता ‘जल मेट्रो’ सुसाट, 10 मार्गांचा मास्टर प्लॅन अंतिम टप्प्यात!
या पार्श्वभूमीवर जुन्या पुलालगत चार पदरी नव्या पुलाचे बांधकाम हाती घेण्यात आले होते. सुमारे 200 मीटर लांबीच्या या नव्या पुलाचे काम आता पूर्ण झाले असून सध्या त्याची भारवाहन क्षमता आणि सुरक्षिततेची अंतिम चाचणी सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार चाचणी पूर्ण होताच पुढील दोन दिवसांत नव्या पुलावरून वाहतूक सुरू केली जाईल.
नव्या वाहतूक आराखड्यानुसार ठाण्याहून नाशिक, मुंब्रा, नवी मुंबई आणि भिवंडीच्या दिशेने जाणारी वाहतूक नव्या साकेत पुलावरून वळवण्यात येणार आहे. तर नाशिक, मुंब्रा, नवी मुंबई आणि भिवंडीहून ठाण्याकडे येणारी वाहतूक जुन्या पुलावरून सुरू राहील. या बदलामुळे वाहतुकीचे नियोजन अधिक सुरळीत होईल आणि वारंवार होणाऱ्या कोंडीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.






