ठाणे- बोरिवली दुहेरी भुयारी मार्गाच्या कामाला सुरूवात झाली असून वाहतुकीचे नियम शुक्रवारपासून (14 नोव्हेंबर) ते 11 मे 2026 पर्यंत लागू केले जाणार आहेत. मध्यरात्री 12 ते सकाळी 6 आणि दुपारी 12 ते सायंकाळी 6 पर्यंत वाहतुकीचे नियम वाहनचालकांना फॉलो करणं अनिवार्य असणार आहे. घोडबंदर मार्गावरील कापूरबावडी, मानपाडा, ब्रम्हांड भागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक वाहन चालक मुल्ला बाग मार्गे वाहतुक करत असतात. येथील वाहतूक बदलाचा परिणाम वाहन चालकांवर होण्याची शक्यता आहे. मुंबईतील पश्चिम उपनगराला थेट ठाणे शहरासोबत जोडण्यासाठी ठाणे- बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे.
advertisement
मुल्ला बाग येथील हिलक्रिस्ट गृहसंकुल येथून निळकंठ ग्रीन गृहसंकुलाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना सत्या शंकर गृहसंकुलाजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने विरुद्ध दिशेकडील मार्गिकेवरून जातील. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. प्रकल्पाच्या निर्मितीसाठी ठेकेदार कंपन्यांच्या वाहनांची ये- जा आणि यंत्रांची वाहतूक या भागातून केली जाईल. त्यामुळे या भागात काही वाहतूक बदल लागू केले आहेत. वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांनी वाहतूक बदलाची अधिसुचना जारी केली आहे. प्रकल्पाच्या कामामुळे झालेल्या वाहतुक बदलाचा नागरिकांना त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे.
