नेमकं काय घडलं?
ऐन गर्दीच्या वेळी ऐरोली-कळवा मार्गावर एका भरधाव कंटेनरचा अपघात झाला. हा कंटेनर रस्त्यावरील दुभाजकाला जोरात धडकला. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, कंटेनर रस्त्याच्या मधोमध अडकला असून त्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक विस्कळीत झाली आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सकाळी 7.45 वाजल्यापासून वाहनांच्या मोठ्या रांगा ऐरोली ते दीघी गावपर्यंत आहेत. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
advertisement
कळवा ते ऐरोली ट्रॅफिक जाम
अपघातामुळे कळवा नाका, खारेगाव आणि ऐरोलीकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांची मोठी कोंडी झाली आहे. सकाळी ऑफिसला जाण्याची वेळ असल्याने चाकरमानी तासनतास वाहतूक कोंडीत अडकून पडले आहेत. अनेक वाहनचालकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला असून, ही कोंडी सोडवण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
पोलीस घटनास्थळी दाखल
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त कंटेनर बाजूला सारण्याचे काम सुरू आहे. मात्र, कोंडी मोठी असल्याने वाहतूक सुरळीत व्हायला किमान एक ते दोन तास लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करा.ठाणे स्टेशनवरून ऐरोलीकडे जाण्यासाठी लोकल रेल्वेचा पर्याय निवडणे सध्या सोयीचे ठरेल. ऑफिसला निघण्यापूर्वी 'गुगल मॅप्स'वर ट्रॅफिकची स्थिती तपासूनच बाहेर पडा.
