सध्याच्या घडीला, ठाण्यातून बोरिवलीला जाण्यासाठी घोडबंदर रोडचा किंवा वेस्टर्न एक्सप्रेस हायवेचा वाहतुकदारांना वापर करावा लागतो. प्रचंड वाहतुकीमुळे, या 23 किलोमीटरच्या अंतरासाठी १ ते दीड तासांचा अवधी लागतो. मात्र, आता 11.8 किलोमीटर लांबीचा दुहेरी बोगदा फक्त 15 मिनिटांमध्येच पूर्ण करणार आहे. या बोगद्यामुळे तब्बल 12 किमीचा प्रवास कमी होणार आहे. बोगद्याचे काम सध्या सुरू असून एमएमआरडीएने त्यांच्या सोशल मिडिया हँडलवर बोगद्याचे काम सुरू असतानाचा एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी अत्याधुनिक बोगदा खोदणाऱ्या यंत्रांचा (टीबीएम) वापर केला जात आहे.
advertisement
भारतातील सर्वात मोठे सिंगल- शील्ड हार्ड रॉक टनल बोरिंग मशीन (TBM) बोगदा खोदणाऱ्या मशीनचे नाव, 'नायक' असं ठेवण्यात आलं आहे. हे 'नायक'मशीन सध्या जोरदार काम करत आहे. यासोबतच 'अर्जुन' नावाच्या दुसऱ्या यंत्रालाही लवकरच कार्यान्वित केले जाणार आहे. हे यंत्र संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कोणत्याही ठिकाणाला बिल्कुल धक्का न लावता भुयारी मार्ग तयार करणार आहे. एमएमआरडीएकडून हा प्रकल्प मे 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे मानस आहे. सध्या, टनल बोरिंग मशीन (TBM) आणि लॉन्च पॅडच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. अंदाजे 18,000 कोटी रुपये खर्च असलेल्या या प्रकल्पासाठी वन विभागाकडून आवश्यक असलेली जमीन हस्तांतरणाचे कामही पूर्ण करण्यात आले आहे.
हा बोगदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणार असल्यामुळे, पर्यावरणप्रेमींकडून या प्रकल्पाला विरोध होण्याची शक्यता होती. एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे की, हा बोगदा जमिनीपासून अंदाजे 23 मीटर खाली आहे, ज्यामुळे राष्ट्रीय उद्यानातील वन्यजीव आणि वनस्पतींना कोणतीही हानी पोहोचणार नाही. शिवाय, बोगद्याच्या बांधकामामुळे कार्बन उत्सर्जन दरवर्षी अंदाजे 1,50,000 मेट्रिक टननी कमी होईल, कारण वाहनांना यापुढे लांब आणि गर्दीच्या मार्गांवरून प्रवास करावा लागणार नाही.
प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये
- एकूण लांबी: 11.8 किलोमीटर (10.25 किमी बोगदा).
- लेनची संख्या: प्रत्येक बोगद्यात 3 लेन (एकूण 6 लेन).
- सुरक्षा: दर 300 मीटरवर आडवे मार्ग आणि आधुनिक वायुवीजन प्रणाली.
- कनेक्टिव्हिटी: बोरिवलीतील मागाठाणे (एकता नगर) आणि ठाण्यातील टिकुजी-नी-वाडी (मानपाडा) या परिसराला जोडेल.
