टीव्हीकेचे प्रमुख आणि अभिनेता विजय यांनी करूर येथील त्यांच्या रॅलीदरम्यान झालेल्या दुःखद चेंगराचेंगरीबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. "माझं हृदय तुटलं आहे; मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. असह्य, अवर्णनीय वेदना आणि दुःखाने थरथर कापत आहे' असं म्हणत विजय यांनी झालेल्या घटनेबद्दल आपली भावना व्यक्त केली.
तसंच, "करूरमध्ये प्राण गमावलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींच्या कुटुंबियांबद्दल मी माझ्या मनापासून संवेदना आणि सहानुभूती व्यक्त करतो. रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांच्या लवकर उपचार मिळण्यासाठी मी प्रार्थना करतो." असं म्हणत विजय यांनी ट्वीट केलं आहे.
नेमकं काय घडलं?
तामिळनाडूतील करूर इथं अभिनेता विजय यांच्या रॅलीचं आयोजन केलं होतं. या रॅलीत तुफान अशी गर्दी झाली होती. अभिनेता विजय हे एका व्हॅनवर उभा राहून रॅलीत सामील झाले होते. रस्त्यावरून रॅली जात असताना ते भाषण करत होते. त्याच दरम्यान एक मुलगा हरवला असल्याची माहिती समोर आली. त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना ही माहिती दिली. विजय यांनी माईकवरून एक मुलगा हरवला आहे, तो शोधण्यासाठी मदत करा. पोलिसांना सहकार्य करा अशी सुचना कार्यकर्त्यांनी दिली आणि स्टेजवरून खाली उतरले. त्यानंतर एकच गर्दी उसळली. गुदमरून अनेक जण बेशुद्ध पडले. तर काही जण गर्दीत दबले गेले. अचानक झालेल्या या घटनेत ३३ जणांचा मृत्यू झाला असल्याचंस मोर आलं. यामध्ये मुलं आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांसह अनेक लोक बेशुद्ध पडले.