या रॉकेटमध्ये सर्व्हिलन्स सॅटेलाइट EOS-N1 आणि इतर 15 उपग्रह होते. मात्र लॉन्चिंगच्या तिसऱ्या टप्प्यात (थर्ड स्टेज) गंभीर तांत्रिक बिघाड झाल्याने संपूर्ण मोहिमच अपयशी ठरली. यापूर्वी मागील वर्षी मे महिन्यात PSLV-C61 ही मोहीमही अशाच तांत्रिक कारणामुळे फसली होती.
90 टक्क्यांहून अधिक यशाचा दर असलेल्या या रॉकेटसोबत अचानक असे काय घडते आहे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांची एंट्री झाल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.
advertisement
डोवालांचा गुप्त दौरा, संशय अधिक गडद
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार अजित डोवाल यांनी 22 जानेवारी रोजी तिरुवनंतपुरममधील विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) येथे अत्यंत गुप्त दौरा केला. हा दौरा इतका गोपनीय होता की, त्याची माहिती बाहेर आल्यानंतरच मोठी खळबळ उडाली.
देशाच्या सर्वोच्च सुरक्षा सल्लागाराला इस्रोच्या केंद्रावर जावे लागणे हे अनेक प्रश्न निर्माण करणारे आहे. हा दौरा केवळ तांत्रिक आढावा घेण्यासाठी होता की, यामागे सबोटाज म्हणजेच घातपाताची शक्यता तपासण्याचा संशय आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
PSLV च्या अपयशामागे बाह्य कट आहे का?
या संदर्भात केंद्रीय अंतराळ मंत्री जितेंद्र सिंह यांनी अधिकृतपणे कोणत्याही प्रकारच्या घातपाताच्या शक्यतेला नकार दिला आहे. त्यांच्या मते, ही अपयशे केवळ तांत्रिक बिघाडामुळे झाली असण्याची शक्यता आहे. मात्र सलग दोन अपयशांमुळे इंटरनल आणि एक्सटर्नल असेसमेंट कमिट्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
जितेंद्र सिंह यांनी उदाहरण देताना सांगितले की, मागच्या वेळी जर ‘बल्ब फ्यूज’ झाला होता, तर यावेळी ‘बाहेरून ट्रिपिंग’ झाली आहे. म्हणजेच दोन्ही वेळच्या अडचणी वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहेत. तरीही प्रश्न असा आहे की, जर सगळे काही सामान्य होते, तर अजित डोवाल यांना हस्तक्षेप का करावा लागला?
सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, जेव्हा देशाचे गुप्तचर आणि सर्व्हिलन्स उपग्रह धोक्यात असतात, तेव्हा सरकार कोणताही धोका हलक्यात घेऊ शकत नाही.
डोवालांच्या गुप्त भेटीचा अर्थ काय?
अजित डोवाल यांचा VSSC दौरा थेट पंतप्रधान कार्यालयातील चिंता दर्शवतो. EOS-N1 सारखे सर्व्हिलन्स उपग्रह देशाच्या सीमासुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यामुळे लॉन्च दरम्यान जर काही गडबड झाली, तर ती केवळ आर्थिक नुकसान नसून राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न बनतो.
सूत्रांच्या माहितीनुसार, डोवाल यांनी शास्त्रज्ञांशी डेटा अॅनालिसिसच्या अतिशय बारकाव्यांवर चर्चा केली. रॉकेटच्या सिस्टीममध्ये बाहेरून कोणतीही छेडछाड झाली आहे का, याची खात्री करून घेणे हा त्यांच्या भेटीचा मुख्य उद्देश होता. या दौऱ्यामुळे अशा अटकळींना बळ मिळाले आहे की, भारताची वाढती अंतराळ ताकद कमकुवत करण्यासाठी एखादे आंतरराष्ट्रीय सिंडिकेट कार्यरत तर नाही ना?
परदेशी भागीदारांचा विश्वास डळमळीत होईल का?
सलग दोन मोठ्या अपयशांनंतरही सरकारचा दावा आहे की, परदेशी ग्राहकांचा इस्रोवरील विश्वास कायम आहे. जितेंद्र सिंह यांच्या मते, 2026 मध्ये 18 लॉन्चची योजना असून कोणत्याही विदेशी भागीदाराने आपली नावे मागे घेतलेली नाहीत. 2027 मध्येही अमेरिका, जपान आणि फ्रान्स यांसारख्या देशांसोबत संयुक्त मोठ्या मोहिमा पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
मात्र वास्तव असे आहे की, PSLV-C62 च्या अपयशामुळे 15 उपग्रह अंतराळात कायमचे हरपले. फक्त एक स्पेनचा उपग्रह अवघ्या 3 मिनिटांसाठी डेटा पाठवू शकला. त्यामुळे इस्रोवर आता आपले जुने वैभव पुन्हा सिद्ध करण्याचा मोठा दबाव आहे.
जूनमधील पुढील मिशन ‘करो किंवा मरो’
इस्रो आता जूनमध्ये होणाऱ्या पुढील PSLV लॉन्चची तयारी करत आहे. हे मिशन भारतासाठी अक्षरशः ‘करो किंवा मरो’ ठरणार आहे. वैज्ञानिकांच्या विविध समित्या सध्या डेटाचे सखोल विश्लेषण करत आहेत, जेणेकरून तिसऱ्या टप्प्यात येणाऱ्या त्रुटी पूर्णपणे दूर करता येतील.
जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केले आहे की, अंतिम अहवाल आल्यानंतरच आवश्यक सुधारणा केल्या जातील. जूनच्या लॉन्चमध्ये सुरक्षेच्या पातळ्या अधिक कडक केल्या जाऊ शकतात. आता संपूर्ण जगाचे लक्ष इस्रोच्या जून मिशनकडे लागले असून, हे मिशनच ठरवेल की भारताचा ‘स्पेस वर्कहॉर्स’ अजूनही अपराजेय आहे की नाही.
