तिरुवनंतपुरम (केरळ): केरळच्या राजकारणात शनिवारी एक ऐतिहासिक बदल घडला. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील एनडीएने पहिल्यांदाच तिरुवनंतपुरम महापालिकेत दणदणीत विजय मिळवला आहे. या निकालामुळे सीपीआय(एम)च्या नेतृत्वाखालील एलडीएफचे तब्बल 45 वर्षांचे वर्चस्व संपुष्टात आले आहे.
advertisement
महापालिकेच्या 101 वॉर्डांपैकी एनडीएने 50 जागांवर विजय मिळवला आहे. सत्ताधारी एलडीएफला केवळ 29 जागांवर समाधान मानावे लागले, तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफला 19 जागा मिळाल्या. उर्वरित 2 जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले.
गेल्या साडेचार दशकांपासून डाव्या पक्षांचे या महापालिकेवर वर्चस्व होते. त्यामुळे राजधानीत मिळालेला हा विजय भाजपासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निकाल भाजपासाठी मोठे बळ देणारा ठरणार आहे.
आकडेवारी पाहता, तिरुवनंतपुरममध्ये भाजपाची ताकद सातत्याने वाढताना दिसते. 2010 मध्ये भाजपाकडे फक्त 6 नगरसेवक होते. 2015 मध्ये ही संख्या 35 झाली होती. 2020 मध्ये थोडी घट होऊन 34 जागा मिळाल्या, तरी भाजपाच मुख्य विरोधी पक्ष ठरला होता. यंदा मात्र 50 जागा जिंकत भाजपाने बहुमताच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे.
हा पराभव काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या मतदारसंघात झाल्याने यूडीएफसाठी चिंतेचा विषय ठरला आहे.
या विजयाचे श्रेय मोठ्या प्रमाणावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांच्या रणनीतीला दिले जात आहे. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतरची ही त्यांची पहिलीच स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होती. त्यांनी प्रचारात ‘विकसित तिरुवनंतपुरम’ या मुद्द्यावर भर दिला. भाजपाने स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध करत राजधानीच्या विकासाचा आराखडा मांडला होता. विजय मिळाल्यास 45 दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी तिरुवनंतपुरमसाठी विकास योजना जाहीर करतील, असेही आश्वासन देण्यात आले होते.
निवडणुकीपूर्वी भाजपाला काही अंतर्गत अडचणींचा सामना करावा लागला. एका विद्यमान नगरसेवकाच्या आत्महत्येची घटना तसेच तिकीट न मिळाल्याने एका आरएसएस कार्यकर्त्याने आत्महत्या केल्याने वाद निर्माण झाला होता. मात्र भाजपाने संघटन मजबूत ठेवत कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यात यश मिळवले.
भाजपाने प्रचारादरम्यान एलडीएफच्या काळातील कथित भ्रष्टाचाराचे मुद्दे ठळकपणे मांडले. मागील महापालिकेवर भ्रष्टाचाराचे आरोप करत ‘भ्रष्टाचारमुक्त कारभार’ देण्याचे आश्वासन भाजपाने दिले. हिंदुत्वासोबतच विकासाचा मुद्दा पुढे करत शहरी मतदारांना आकर्षित करण्यात भाजपाला यश आले आहे.
