वारसा राजकारणाचा नाही, तर संघर्षाचा!
नितीन नबीन यांचा जन्म २३ मे १९८० रोजी रांची येथे झाला. त्यांचे वडील नबीन किशोर प्रसाद सिन्हा हे बिहार भाजपचे दिग्गज नेते होते. वडिलांच्या निधनानंतर वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी (२००६ मध्ये) नबीन यांनी राजकारणात पाऊल ठेवलं. पोटनिवडणुकीत विजय मिळवून त्यांनी सुरू केलेला हा प्रवास आज थेट दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचला आहे. बांकीपूर मतदारसंघातून सलग ५ वेळा आमदार होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.
advertisement
युवा मोर्चाची 'भट्टी' आणि मंत्रिपदाचा अनुभव
नितिन नबीन हे भारतीय जनता युवा मोर्चाच्या मुशीतून घडलेले नेते आहेत. त्यांनी बिहार भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून संघटनेत काम केले आहे. जम्मू-काश्मीरमधील 'राष्ट्रीय एकता यात्रा' असो किंवा तवांगपर्यंतची 'शहीद सन्मान यात्रा', नबीन यांनी नेहमीच मैदानात उतरून काम केले. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये त्यांनी 'रस्ते विकास' आणि 'नगर विकास' सारखी महत्त्वाची मंत्रिपदे भूषवून प्रशासकीय कामाचा ठसा उमटवला आहे.
पंतप्रधानांचा विश्वास आणि नबीन यांचा स्ट्राईक रेट
डिसेंबर २०२५ मध्ये त्यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्याकडे पूर्णवेळ अध्यक्षपद सोपवण्यात आले आहे. २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांनी राजदच्या उमेदवाराचा ५१ हजार मतांनी पराभव करून आपली जनमानसातील पकड सिद्ध केली होती. त्यांच्या याच 'स्ट्राईक रेट' आणि संघटनात्मक कौशल्यावर पंतप्रधान मोदींनी विश्वास टाकला आहे.
आव्हानांचे डोंगर आणि २०२९ चे लक्ष
नितिन नबीन यांच्यासमोर विजयाचा रथ पुढे नेण्याचे मोठे आव्हान आहे
१. विधानसभा निवडणुका: पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये पक्षाचा विस्तार करणे ही त्यांची पहिली परीक्षा असेल.
२. २०२९ ची तयारी: पुढील लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची बांधणी करणे आणि ३३ टक्के महिला आरक्षणाची अंमलबजावणी करून महिला मतदारांना जोडून घेणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट असेल.
३. परिसीमन प्रक्रिया: लोकसभेच्या जागांच्या पुनर्रचनेनंतर उद्भवणाऱ्या राजकीय स्थितीला हाताळण्याचे कसब त्यांना दाखवावे लागेल.
