पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांनी आपलं स्वप्न म्हणून हा बंगला बांधला होता. फाळणीच्या अवघ्या काही दिवस आधीपर्यंत म्हणजे 7 ऑगस्ट 1947 पर्यंत जिन्ना याच घरात राहत होते. पण आज हे घर केवळ इतिहासाचा एक ओसाड तुकडा बनून राहिलं आहे.
2 लाखांचा थाट आणि इटालियन मार्बल
1936 चा तो काळ होता. जिन्नांनी हा बंगला बांधण्यासाठी त्या काळी तब्बल २ लाख रुपये खर्च केले होते. ब्रिटीश आर्किटेक्ट क्लॉड बॅटली यांनी याचं डिझाइन तयार केलं होतं. 2.5 एकरच्या विस्तीर्ण जागेत पसरलेल्या या घराच्या मजल्यांवर खास इटालियन मार्बल बसवण्यात आला होता. या बंगल्याला 'साउथ कोर्ट' (South Court) असं नाव देण्यात आलं होतं. इथल्या खिडक्यांतून दिसणारा अरबी समुद्र आणि बागेतील शांतता यावरूनच जिन्नांच्या राजेशाही आवडीची कल्पना येते.
advertisement
या बंगल्याच्या भिंतींनी भारतीय राजकारणातील सर्वात महत्त्वाचे क्षण पाहिले आहेत. महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू अनेकदा या बंगल्यावर जिन्नांना भेटायला यायचे. भारताचं भवितव्य काय असावं, यावर याच बंगल्याच्या दिवाणखान्यात तासनतास चर्चा रंगायच्या. पण 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाला, फाळणी झाली आणि जिन्ना पाकिस्तानात गेले.
"मला पुन्हा माझ्या मुंबईच्या घरी यायचंय..."
जिन्ना पाकिस्तानात गेले खरे, पण त्यांचं मन या मुंबईतल्या बंगल्यातच अडकलं होतं. त्यांनी तत्कालीन भारतीय उच्चायुक्तांकडे इच्छा व्यक्त केली होती की, हा बंगला कोणालाही भाड्याने देऊ नका, मला पुन्हा माझ्या मुंबईच्या घरी येऊन राहायचं आहे. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. 1948 मध्ये जिन्नांचं निधन झालं आणि त्यांच्या या घरात पुन्हा कधीच कोणी राहू शकलं नाही.
सात दशकांपासून का आहे ओसाड?
गेल्या 75 वर्षांपासून हा बंगला रिकामाच आहे. या संपत्तीवरून अनेक कायदेशीर लढाया झाल्या.
पाकिस्तानचा हट्ट: पाकिस्तान सरकारने हा बंगला त्यांच्या दूतावासासाठी देण्याची मागणी केली होती.
वारसा हक्क: जिन्नांची मुलगी दीना वाडिया यांनीही या घरासाठी कोर्टात धाव घेतली होती.
सध्या ही वास्तू भारत सरकारच्या ताब्यात आहे. मधल्या काळात हा बंगला पाडून तिथे सांस्कृतिक केंद्र उभं करण्याची मागणीही झाली होती, पण कायदेशीर गुंतागुंतीमुळे हे घर आजही तसंच 'जैसे थे' अवस्थेत आहे.
मुंबईच्या सर्वात महागड्या परिसरात 2.5 एकरची ही कोट्यवधींची जागा आज केवळ एका ओसाड वास्तूमुळे शांत उभी आहे. जिथे कधी देशाचं राजकारण ठरायचं, तिथे आज केवळ झाडांची पानं सळसळताना दिसतात.
