पंतप्रधान मोदींच्या भाषणातील मुद्दे
आम्हाला तिसऱ्यांदा देशाची सेवा करण्याची संधी दिलीय ही लोकशाही जगतासाठी खूप मोठी आणि महत्त्वाची घटना आहे. ही गौरवशाली घटना आहे. प्रत्येक कसोटीवर खरं उतरल्यानंतर देशाच्या जनतेने जनादेश दिला आहे. जनतेनं पाहिलंय की गरीबांच्या कल्याणासाठी समर्पण भावनेने जनसेवा हीच इश्वरसेवा हा मंत्र आचरणात आणला. 10 वर्षात 25 कोटी लोक गरीबीतून बाहेर निघाले आहेत. स्वातंत्र्यानंतर इतक्या कमी वेळेत इतक्या मोठ्या प्रमाणावर गरीबीतून बाहेर काढण्याचा यशस्वी प्रयत्न आमच्या यशाचं कारण बनला.
advertisement
जेव्हा 2014 मध्ये पहिल्यांदा विजय मिळाला तेव्हा निवडणूक प्रचारात आम्ही म्हटलं होतं आमची भ्रष्टाचाराविरोधात भूमिका कठोर राहील. मला अभिमान आहे की आमच्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराविरोधात झिरो टॉलरन्सची भूमिका आहे. त्यासाठी देशाने आम्हाला निवडून दिलंय.
जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलला आहे. देशाच्या जनतेने पाहिलं आहे की आमचं एकमेव ध्येय राष्ट्र प्रथम हे आहे. आमची धोरणं आणि आमचे निर्णय, आमचं कामाचं ध्येय फक्त राष्ट्र प्रथम हेच प्राधान्य राहिलं आहे.
10 वर्षात आमचं सरकार सबका साथ सबका विकास या मंत्रानुसार देशाच्या जनतेचं कल्याण करण्याचं प्रयत्न करत आहे. आम्ही त्या सिद्धांतानुसार काम करतो ज्यात सर्व पंथ समभाव मानले जातात. त्यानुसार आम्ही देशाची सेवा करण्याचा प्रयत्न केला. या देशाने बराच काळ तुष्टीकरण राजकारण केलं. आम्ही तुष्टीकरण नाही तर संतुष्टीकरणाच्या विचाराने पुढे जात आहे. जेव्हा आम्ही संतुष्टीकरणाबद्दल बोलतो त्याचा अर्थ प्रत्येक योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं हा आहे. हाच खरा सामाजिक न्याय असतो. हाच खरा धर्मनिरपेक्षपणा आहे. म्हणूनच देशाच्या जनतेने तिसऱ्यांदा सत्ता दिलीय.
माझ्या वेळेचा क्षण क्षण आणि शरीराचा कण कण आम्ही देश वासियांच्या विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वापरू. देश निराशेच्या गर्तेत बुडाला होता. २०१४ च्या आधी देशाने सर्वात मोठं नुकसान सहन केलं. देशाचा आत्मविश्वास गमावला होता. विश्वास आणि आत्मविश्वास गमावतात तेव्हा त्यातून उभा राहणं कठीण असतं. या देशाचं काही होऊ शकत नाही अशी देशवासियांची भावना होती.
तेव्हा वृत्तपत्रांचे रकाने घोटाळ्यांच्या बातम्यांनी भरलेले असायचे. शेकडो कोटींचे रोज नवे घोटाळे, घोटाळ्यांची घोटाळ्यांसी स्पर्धा, घोटाळेबाज लोकांचे घोटाळे याचाच एक कालखंड होता. बेशरमपणाची हद्द सार्वजनिकपणे मान्य केली जायची. दिल्लीतून रुपया निघाला की 15 पैसे पोहचतात. एक रुपयात 85 पैशांचा घोटाळा, या घोटाळ्यांनी देशाला बुडवलं होतं.
मोफत राशनसुद्धा मिळायचं नाही, त्यासाठीही लाच द्यावी लागायची. अनेक भारतीय इतके निराश झाले की ते नशिबाला दोष देऊन आयुष्य जगायचे. तो २०१४ च्या आधीचा काळ होता, तेव्हा देशाचं काही होऊ शकत नाही हेच लोकांच्या मनात बसलं होतं. तेव्हा देशाच्या जनतेने आम्हाला सेवा करण्याची संधी दिली आम्हाला निवडलं. त्या क्षणी देशात परिवर्तन युगाची सुरुवात झाली, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली.