पंतप्रधानांनी भाषण सुरू करताच विरोधी खासदारांनी “LoP को बोलने दो” आणि “तानाशाही नही चलेगी” अशा घोषणा दिल्या. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर हलक्याफुलक्या शब्दांत टोला लगावत पंतप्रधान मोदी म्हणाले, “खर्गेजींचे वय लक्षात घेता, त्यांना बसूनच घोषणा देता येतील अशी परवानगी द्यावी, म्हणजे त्यांना त्रास होणार नाही. मागे तरुण सदस्य उभे आहेत.” या वक्तव्यामुळे भाजप खासदारांमध्ये हशा पिकला.
advertisement
भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी पंतप्रधानांच्या या भूमिकेचे कौतुक करताना, हे नेतृत्व, संयम आणि लोकशाही परिपक्वतेचे उदाहरण असल्याचे म्हटले. त्यांनी राहुल गांधींवर अप्रत्यक्ष टीका करत, “घराणेशाही मानसिकतेतून येणाऱ्या हक्काच्या भावनेच्या उलट, पंतप्रधानांनी संसदीय संस्थांचा आदर कसा करायचा हे दाखवून दिले,” असेही नमूद केले.
दरम्यान, पंतप्रधान मोदी ‘विकसित भारत 2047’ या दृष्टीकोनावर भाष्य करत असतानाच विरोधी पक्षांच्या खासदारांनी राज्यसभेतून वॉकआऊट केला.
लोकसभेत उत्तर का दिले नाही?
ही घडामोड लोकसभेतील वादानंतर समोर आली आहे. बुधवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर पंतप्रधान मोदी उत्तर देणार होते, मात्र ते सभागृहात आले नाहीत. याबाबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गुरुवारी महत्त्वाची माहिती दिली.
ओम बिर्ला म्हणाले, “पंतप्रधानांचे भाषण होणार असताना मला माहिती मिळाली की काही काँग्रेस खासदार पंतप्रधानांच्या आसनाजवळ अयोग्य प्रकार घडवू शकतात. असा प्रकार घडला असता, देशाच्या लोकशाही परंपरांना तडा गेला असता. त्यामुळेच मी पंतप्रधानांना त्या दिवशी सभागृहात येऊ नये, असा सल्ला दिला.”
एएनआय वृत्तसंस्थेच्या सूत्रांनुसार, काही काँग्रेस खासदारांकडून पंतप्रधानांवर शारीरिक हल्ल्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली होती आणि त्यामुळेच लोकसभा तहकूब करण्यात आली.
मात्र या आरोपांचा विरोधकांनी जोरदार इन्कार केला. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी स्पष्टपणे सांगितले, “पंतप्रधानांवर हात उचलण्याचा किंवा त्यांना इजा पोहोचवण्याचा प्रश्नच येत नाही.”
