जनतेचे प्रश्न मांडणे हा गुन्हा आहे का?
व्हिडीओत राघव चड्ढा यांनी 'आप'च्या नेतृत्वावर शरसंधान साधले. संसदेत सर्वसामान्यांचे मुद्दे उचलल्यामुळेच त्यांना शिक्षा देण्यात आली आहे. "मी संसदेत जेव्हा जेव्हा बोलतो, तेव्हा जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मांडतो. कदाचित मी असे विषय निवडतो जे सहसा संसदेत चर्चिले जात नाहीत. पण जनतेचे प्रश्न मांडणे हा गुन्हा आहे का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. चड्ढा पुढे म्हणाले की, माझ्या बोलण्यामुळे देशातील आम आदमीचा फायदा झाला, पण आम आदमी पार्टीचे काय नुकसान झाले, हे कळायला मार्ग नाही.
advertisement
'आप'चं राज्यसभा सचिवालयाला पत्र...
आम आदमी पार्टीने नुकतेच राज्यसभा सचिवालयाला पत्र लिहून राघव चड्ढा यांना उपनेतेपदावरून हटवण्याची विनंती केली होती. इतकेच नाही, तर त्यांच्या जागी पंजाबचे खासदार अशोक मित्तल यांचे नाव प्रस्तावित करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पक्षाच्या निर्धारित कोट्यातून राघव चड्ढा यांना बोलण्यासाठी वेळ देऊ नये, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
'वक्त आने पर सैलाब बनूँगा'
पक्षाच्या या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करताना चड्ढा यांनी सूचक इशारा दिला आहे. ते म्हणाले, "ज्यांनी मला गप्प करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांना सांगू इच्छितो - माझ्या शांततेला माझी हार समजू नका, मी तो समुद्र असून जो वेळ आल्यावर महापूर बनतो." या वक्तव्यानं आता आपमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
