9 वर्षांची मुलगी हरवली अन् 39 जणांचा जीव गेला
विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, तामिळनाडू वेत्री कझगम (टीव्हीके) प्रमुख विजय यांना पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी ५०,००० हून अधिक लोक जमले होते. हजारोंच्या संख्येनं लोक एकत्र आले तरी सर्व काही सुरळीत सुरू होतं. सुरक्षा रक्षक आणि पोलिसांकडून योग्य ती काळजी घतली जात होती. गर्दी नियंत्रणात होती. पण एक ९ वर्षांची मुलगी गर्दीत हरवल्याची माहिती समोर आली आणि चेंगराचेंगरीची घटना घडली, असं सांगण्यात येत आहे.
advertisement
लोकांचा मोठा समुद्र एका दिशेनं पुढे सरकला
नऊ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्यानंतर रॅलीत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. अनेक लोक अचानक ती मुलगी शेवटची ज्या ठिकाणी दिसली होती, त्या दिशेने तिचा शोध घ्यायला जाऊ लागले. लोकांचा मोठा समुद्र अचानक एका दिशेने पुढे सरकला आणि चेंगराचेंगरीची घटना घडली. रॅलीत मोठ्या संख्येने सुरक्षा कर्मचारी तैनात असतानाही परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. या घटनेत आतापर्यंत एकूण ३९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर शेकडो लोक गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विजयने अचानक भाषण संपवलं
चेंगराचेंगरीची घटना घडताच विजय थलपती यांनी अचानक आपले भाषण संपवले आणि गर्दीला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना गर्दी कमी करण्यासाठी मदत करण्याचं आवाहनही केले. घटनास्थळी प्रचंड गर्दी असल्याने जखमींना रुग्णालयात घेऊन जाण्यास अडचणी निर्माण झाल्या.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन काय म्हणाले?
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या दुर्घटनेवर प्रतिक्रिया दिली. तसेच अधिकाऱ्यांना शक्य असेल ती सर्व मदत करण्याचे आदेश दिले. स्टॅलिन ट्वीटमध्ये म्हणाले, "करुरमधून येणारी बातमी चिंताजनक आहे. गर्दीत अडकल्यानंतर बेशुद्ध पडलेल्या आणि रुग्णालयात दाखल झालेल्या नागरिकांना मी त्वरित वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत. मी माजी मंत्री सेंथिल बालाजी, मंत्री सुब्रमण्यम मा आणि जिल्हाधिकाऱ्यांशी याबद्दल बोललो आहे."