संसदेत नेमकं काय काय झालं?
सुरुवातीला विरोधी पक्षांमधील सदस्यांनी विधेयकात सुचवलेल्या दुरुस्त्यांबाबत आवाजी मतदानाची मागणी फेटाळण्यात आली. त्यानंतर या विधेयकावर दिवसभर चर्चा झाली. विरोधी पक्षांमधीन अनेक नेत्यांनी या विधेयकामध्ये दुरुस्त्या सूचवल्या. त्यावर देखील चर्चा झाली. एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी, शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत, काँग्रेसचे गौरव गोगोई, इम्रान मसूद, राजीव रंजन यांनी अनेक मुद्दे मांडले. मात्र, या सुचवलेली दुरुस्ती आवाजी मतदानाने फेटाळून लावण्यात आल्या. अशातच विधेयकावर प्रत्यक्ष मतदान पार पडलं. एकूण 520 सदस्यांनी मतदान केले. यामध्ये या विधेयकाच्या बाजूने 288 तर विरोधात 232 एवढी मतं पडली.
advertisement
अखेर, वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मध्यरात्री 1.56 वाजता मंजूर झालं. विधेयकावर मतदान 1 तास 50 मिनिटे चाललं. विधेयकाच्या बाजूने 288 मते पडली, तर विरोधात 232 मतं पडली. विधेयक मंजूर झाल्यानंतर काँग्रेससह विरोधी खासदारांनी नाराजी व्यक्त केली. तर भाजपने याचं स्वागत केलंय.
वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक आहे काय?
देशात स्वातंत्र्यानंतर 1954 मध्ये वक्फ कायदा लागू झाला होता. वक्फ बोर्डाची देशात किमान 8 लाख एकरांहून अधिक जमीन व अंदाजे सव्वा लाख कोटी रुपयांची मालमत्ता आहे. वक्फ बोर्ड कायद्याच्या कलम 40 अंतर्गत वक्फ मंडळाला ‘रिझन टू बिलीव्ह’चा अधिकार प्राप्त होतो. यानुसार एखादी मालमत्ता वक्फ संपत्ती आहे, असं या मंडळाला वाटलं तर स्वतः ती वक्फ संपत्ती असल्याचे घोषित शकतात. अशातच या विधेयकामुळे आर्थिक गैरव्यवस्थापन रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या जातील, असं सरकारचं म्हणणं आहे. तर वित्तीय शिस्त राखण्यासाठी आणि जनतेचा विश्वास मिळवण्यासाठी कडक उपाययोजना केल्या जातील.
काँग्रेसची टीका
काँग्रेस खासदार आणि जेपीसी सदस्य इम्रान मसूद म्हणतात, "हा काळा दिवस आहे... हा आमच्या हक्कांवर हल्ला आहे... मुस्लिम समुदाय आणि वक्फ दोघांनाही याचा त्रास सहन करावा लागणार आहे... हा दिवस इतिहासात काळा दिवस म्हणून नोंदवला जाईल... आम्ही न्यायालयात जाऊ आणि या विधेयकाविरुद्ध लढू"
गरीब मुस्लिम लाभापासून वंचित म्हणून... - अनुराग ठाकूर
वक्फ (दुरुस्ती) विधेयक ही एक नवी आशा आहे. गरीब मुस्लिम कुटुंबांना या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आणि २ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता मिळाली; गेल्या ७५ वर्षांत नऊ लाख एकरपेक्षा जास्त जमीन फक्त २०० लोकांच्या हाती देण्यात आली... काँग्रेसने कधीही गरीब मुस्लिम कुटुंबांना फायदा व्हावा यासाठी काम केले नाही, असं भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे.