अनेकांना वाटतं की एकदा लग्न झालं की करिअरची दारं बंद होतात, विशेषतः महिलांसाठी हे आव्हान मोठं असतं. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका जिद्दी महिलेची गोष्ट सांगणार आहोत, जिने लग्नानंतर, संसाराच्या जबाबदाऱ्या सांभाळत आणि सलग चार वेळा पराभवाचा धक्का पचवला आणि देशातील सर्वात कठीण मानली जाणारी 'UPSC' परीक्षा केवळ उत्तीर्णच केली नाही, तर टॉप 10 मध्ये स्थान मिळवलं. ही प्रेरणादायी गोष्ट आहे आयएएस संजीता महापात्रा यांची.
advertisement
आयआयटी कानपूर ते यूपीएससीचा प्रवास
ओडिशामधील राउरकेला शहरात राहणाऱ्या संजीता यांना लहानपणापासूनच अभ्यासाची प्रचंड ओढ होती. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी देशातील प्रतिष्ठित आयआयटी (IIT) कानपूरमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. इंजिनिअरिंग करत असतानाच त्यांनी ठरवलं होतं की, त्यांना प्रशासकीय सेवेत जाऊन देशाची सेवा करायची आहे. मात्र, पदवी मिळाल्यानंतरचा प्रवास त्यांच्यासाठी सोपा नव्हता.
ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर संजीता यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली. पण पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रयत्नात त्यांना साध्या 'प्रिलिम्स' परीक्षेतही यश मिळालं नाही. सलग तीन वेळा अपयश आल्यावर कोणताही सामान्य माणूस खचून गेला असता. संजीता यांनीही काही काळ विश्रांती घेतली आणि एका कंपनीत नोकरी सुरू केली. पण त्यांच्या मनातलं 'आयएएस' बनण्याचं स्वप्न अजूनही जिवंत होतं.
नोकरी सांभाळत त्यांनी चौथा प्रयत्न केला, पण पुन्हा नशिबाने साथ दिली नाही. शेवटी त्यांनी एक मोठा निर्णय घेतला त्यांनी आपली चालू नोकरी सोडली आणि पूर्णवेळ अभ्यासाला वाहून घेतलं.
यूपीएससीच्या या प्रदीर्घ प्रवासात संजीता यांचं लग्न झालं. अनेकदा लग्नानंतर अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं कठीण होतं, पण संजीता यांच्या बाबतीत उलट घडलं. त्यांचे पती बिस्वा रंजन मुंडारी (जे भारतीय रिझर्व्ह बँकेत मॅनेजर आहेत) आणि त्यांच्या सासरच्या मंडळींनी त्यांना अभ्यासासाठी पूर्ण स्वातंत्र्य आणि पाठिंबा दिला. संजीता यांनी कोणत्याही महागड्या कोचिंग क्लासचा आधार न घेता, केवळ ऑनलाईन स्टडी मटेरियल, NCERT ची पुस्तकं आणि वर्तमानपत्रांच्या जोरावर स्वतःचा मार्ग निवडला.
5 वा प्रयत्न आणि ऐतिहासिक यश
2019 साली संजीता यांनी आपला 5 वा प्रयत्न दिला. गेल्या अनेक वर्षांची मेहनत, रात्रीचा जागलेला अभ्यास आणि कुटुंबीयांचा विश्वास सार्थ ठरला. 2019 च्या यूपीएससी निकालात संजीता महापात्रा यांनी केवळ परीक्षा उत्तीर्णच केली नाही, तर संपूर्ण भारतात 10 वा रँक (All India Rank 10) मिळवून इतिहास घडवला.
एक इंजिनिअर ते आयएएस अधिकारी हा संजीता यांचा प्रवास आज लाखो तरुणांसाठी आशेचा किरण ठरत आहे. संजीता यांनी हे दाखवून दिलं की, जर तुमच्याकडे जिद्द असेल आणि स्वतःवर विश्वास असेल, तर कोणतंही अपयश तुम्हाला तुमच्या ध्येयापासून रोखू शकत नाही. संजीता यांची गोष्ट आपल्याला हेच शिकवते की, वेळ लागेल पण तुमची मेहनत कधीच वाया जाणार नाही.
