इंडिया आघाडीची मतं फुटली
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये सर्व 315 खासदारांनी सुदर्शन रेड्डी यांना मतदान केल्याचा दावा काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला होता, पण निवडणुकीचे निकाल हाती येताच इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. जयराम रमेश यांनी 315 खासदारांनी सुदर्शन रेड्डी यांना मतदान केल्याचं सांगितलं असलं तरी प्रत्यक्षात त्यांना पहिल्या पसंतीची फक्त 300 मतं पडली, म्हणजेच 15 खासदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
advertisement
15 खासदारांनी क्रॉस व्होटिंग केलं असेल तर तो इंडिया आघाडीसाठी धक्का मानला जात आहे. क्रॉस व्होटिंग करणारे हे 15 खासदार कोण आहेत? याबाबत आता राजकीय वर्तुळामध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. या निवडणुकीमध्ये पक्षाचा व्हीप लागत नसल्यामुळे या 15 खासदारांवर कारवाई होण्याची शक्यताही कमी आहे.
11 खासदारांची माघार
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमधून 11 खासदारांनी माघार घेतली. बिजू जनता दल आणि भारत राष्ट्र समिती या दोन पक्षांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली. तर वायएसआर काँग्रेसच्या 11 खासदारांनीही सीपी राधाकृष्णन यांना मत दिलं. या दोन्ही पक्षांची माघार आणि वायएसआर काँग्रेसच्या भूमिका भाजपसाठी फायदेशीर ठरली.