रेल्वे तिकिटांची कमतरता हे वर्षानुवर्षांचं समस्याच गणेशभक्तांना भेडसावत आहे. गणेशभक्तांची होणारी ही त्रस्त अवस्था लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने यावर्षी आधीच 250 गणपती विशेष गाड्यांची घोषणा केली होती. त्यातच आता मध्य रेल्वेने आणखी 44 गणपती विशेष ट्रेन चालवणार आहे. त्याशिवाय आणखी 6 विशेष गाड्या देखील लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.
काही मिनिटांतच रेल्वेचं तिकीट वेटिंगवर...
advertisement
रेल्वेच्या गणेशोत्सव विशेष 44 गाड्यांचे बुकिंग 3 ऑगस्टपासून सुरू होणार होतं. मात्र, आजपासून या गाड्यांचे बुकिंग सुरू झाल्यानंतर नेहमीप्रमाणेच बुकिंग सुरू होताच अवघ्या काही मिनिटांत आरक्षणाची सर्व सीट्स भरून गेल्याचं पाहायला मिळालं. काही मिनिटांत ‘वेटिंग लिस्ट’ लांबत चालल्याने गणेशभक्तांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसून आला.
गेल्या काही वर्षांत कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पालघर या भागातून लाखो लोक गणपतीसाठी कोकणात जातात. त्यामुळेच रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्यात येतात. मात्र, काही मिनिटातंच गाड्यांना वेटिंग लागत असल्याने काहीतरी काळबेरं असल्याचा संशय प्रवाशांच्या मनात आहे.
रेल्वेकडून विशेष गाड्यांची संख्या वाढवली जात असली तरी प्रत्यक्षात तिकिट मिळवणं हे गणेशभक्तांसाठी दरवर्षीचा प्रकार घडतोय. त्यामुळे अनेकजण आता एसटी अथवा खाजगी वाहतुकीकडे वळत आहेत.
रेल्वे प्रशासनाने यंदा आरक्षण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याचे आश्वासन दिलं होते. मात्र, काही मिनिटात एवढ्या प्रमाणावर बुकिंग होत असल्यावरून रेल्वेच्या दाव्यावर प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरूनही हाल...
अनेक कोकणवासिय एसटी अथवा खासगी वाहतुकीने कोकणात जातात. मात्र, कोकणात जाणारा मुंबई-गोवा महामार्गाची दुरावस्था आणि वाहतूक कोंडी देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. पावसाळ्यात या महामार्गावर अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य असल्याचे दिसून येत आहे. त्याशिवाय, कोकणात जाताना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे गणेशोत्सवात जाण्यासाठी अनेकजण रेल्वेला प्राधान्य देतात.