सोलापूर - वातावरणातील बदलाचा सर्वाधिक परिणाम हा शेती व्यवसायावर होतो. यामध्ये लागवडीपासून काढणीपर्यंत कांद्याचे योग्य नियोजन झाले तरच हे पीक शेतकऱ्याच्या पदरात पडते. यंदा तर दर 15 दिवसांनी हवामानात बदल होत आहे. त्यामुळे किडीचा प्रादुरर्भाव हा वाढत आहे. पावसाळ्यात कांद्याच्या पिकांवर कशी काळजी घ्यावी, कांद्याच्या रोगावर कसे नियंत्रण करावे, या संदर्भातील अधिक माहिती डॉ. लालासाहेब तांबडे (वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर) यांनी दिली.
advertisement
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, सोलापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात कांदा पिकाची मोठया प्रमाणात लागवड चालू आहे तर काही ठिकाणी लागवड झाली आहे. कांद्याच्या पिकांवर सर्वात जास्त मोठी समस्या म्हणजे त्या कांदा पिकावर येणारे फूल किडे म्हणजेच टाके आणि दुसरा कांद्यावरचा महत्वाचा रोग म्हणजे करपा हा आहे.
करपा रोग हा तीन प्रकारचा असतो. त्यात जांभळा, काळा असतो. पण बुरशीमुळे काळा करपा सोलापुरात खुप मोठ्या प्रमाणावर येतो. याचे व्यवस्थापन करणे खूप महत्त्वाचे असते. मागच्या 15 ते 20 दिवसांपासून थोड्या थोड्या दिवसाला पाऊस येत आहे. त्यामुळे करपा रोग कांद्यावर पडण्यासाठी उपयोगी वातावरण आहे. या सर्व परिस्थितीत सोलापुरात काही ठिकाणीं करपा रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर झाला आहे.
याचे जर व्यवस्थापन करायचे असेल तर दोन फवारणी महत्वाच्या आहेत. पहिली फवारणी म्हणजे फिप्रोनील साधारणता 1.5 मिली प्रतिलीटर पाण्यामध्ये, टेब्युकोनॅझोल 1 मिली प्रतिलीटर पाण्यामध्ये आणि स्टिकर 0.5 मिली प्रतिलीटर पाण्यामध्ये घेऊन जर फवारणी घेतली तर कांद्याचे व्यवस्थापन व्यवस्थित होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
तसेच कांद्यामध्ये जे फूल किडे आहे, त्याचे व्यवस्थापन करण्यासाठीं निळे चिकट सापळे एकरी साधारणत: 8 ते 10 जर आपण बसविले तर त्या किडीचे व्यवस्थापन होऊ शकते. अशाप्रकारे कांद्यामध्ये एकात्मिकपणे व्यवस्थापन केल्यास कीड आणि रोगाचा नियंत्रण होईल आणि कांद्यापासून चांगला उत्पन्न शेतकऱ्यांना मिळेल, अशी माहिती डॉ. लालासाहेब रावसाहेब तांबडे (वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर) यांनी दिली.