Famous VadaPav Mumbai : 50 वर्षांची परंपरा, दररोज संध्याकाळी 4 वाजता वडापाव खाण्यासाठी लागते रांग, मुंबईतील हे ठिकाण माहितीये?
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
मुंबई आणि वडापाव यांचं नातं अतूट आहे. कितीही नवीन पदार्थ आले तरी मुंबईकरांच्या मनात आणि पोटात वडापावच अव्वल राहणार. आणि असाच एक वडापाव आहे, ज्यासाठी दररोज संध्याकाळी चार वाजल्यापासून भलीमोठी रांग लागते आणि ती रात्रीपर्यंत कायम असते.
advertisement
1/5

मुंबई म्हटलं की लोकल ट्रेन, गर्दी आणि खवय्येगिरी हे तिन्ही शब्द आपोआप आठवतात. आजकाल नवनवीन डिशेस येत आहेत. मोमो, चायनीज भेळ, फ्युजन पदार्थ, वेगवेगळे स्नॅक्स काही येतात आणि काही काळानंतर गायबही होतात. पण एक पदार्थ मात्र कधीच मागे पडत नाही तो म्हणजे वडापाव. मुंबई आणि वडापाव यांचं नातं अतूट आहे. कितीही नवीन पदार्थ आले तरी मुंबईकरांच्या मनात आणि पोटात वडापावच अव्वल राहणार. आणि असाच एक वडापाव आहे, ज्यासाठी दररोज संध्याकाळी चार वाजल्यापासून भलीमोठी रांग लागते आणि ती रात्रीपर्यंत कायम असते. फक्त 20 रुपयांत मिळणारा हा गरमागरम वडापाव इतका खास का आहे, हे जाणून घेऊया.
advertisement
2/5
मुंबईतील विलेपार्ले हे वडापावचं माहेरघर मानलं जातं. इथे अनेक प्रसिद्ध वडापाव विक्रेते आहेत. त्यातलाच एक म्हणजे श्री स्वामी समर्थ वडापाव. हा स्टॉल दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह यांच्या अगदी बाहेर, नाट्यगृहाला लागूनच आहे. जवळपास 50 वर्षांहून अधिक काळ हा वडापाव इथेच मिळतो आहे. अर्धशतक उलटलं तरी या वडापावची चव अजूनही तशीच आहे. किंमतही फक्त 20 रुपये, त्यामुळे सर्वसामान्यांपासून कलाकारांपर्यंत सगळ्यांची इथे वर्दळ असते. नाटकाचा प्रयोग संपल्यानंतर अनेक कलाकार मंडळीही खास इथे वडापाव खायला येत असत.
advertisement
3/5
या वडापावची खासियत म्हणजे त्याची साधी पण अफलातून चव. ताज्या बटाट्याचा मऊसर वडा, बाहेरून कुरकुरीत आणि आतून हलका मसालेदार. गरमागरम वडा थेट कढईतून काढून मऊ, ताज्या पावात ठेवला जातो. वर्षानुवर्षे तीच चव टिकवून ठेवणं हीच या ठिकाणाची खरी ताकद आहे. वडा तळण्यासाठी वापरला जाणारा मसाला आणि त्याची चव आजही बदललेली नाही. त्यामुळे एकदा इथे वडापाव खाल्ला की पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं.
advertisement
4/5
इथे गर्दी कितीही असली तरी प्रत्येकाला गरमागरम वडापावच दिला जातो. सोबत मिळणारा कुरकुरीत चुरा, तिखट-चविष्ट कोरडी चटणी आणि तळलेल्या हिरव्या मिरच्या ही त्याची खास ओळख आहे. बटाट्याचा भरदार वडा, मऊ पाव आणि मसालेदार चटणी या सगळ्यांचा संगम म्हणजे खऱ्या अर्थाने मुंबईचा अस्सल स्वाद होय.
advertisement
5/5
विशेष म्हणजे विलेपार्ले मध्ये फक्त श्री स्वामी समर्थच नव्हे, तर बाबू वडापाव, पार्ले सम्राट वडापाव, सम्राट वडापाव, विदर्भ वडापाव आणि इतरही काही जुने-प्रसिद्ध वडापाव विक्रेते आहेत, जे त्यांच्या वेगळ्या चवीसाठी ओळखले जातात. प्रत्येकाची चव थोडी वेगळी, पण तितकीच लज्जतदार. त्यामुळे खऱ्या अर्थाने वडापावची सफर करायची असेल, तर विलेपार्ले येथे एक फेरी मारणं प्रत्येक खवय्यासाठी गरजेचंच आहे. मुंबई आणि वडापाव यांचं नातं जितकं घट्ट, तितकीच विलेपार्ल्यातील वडापावची परंपरा आजही तितक्याच जोमाने सुरू आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
Famous VadaPav Mumbai : 50 वर्षांची परंपरा, दररोज संध्याकाळी 4 वाजता वडापाव खाण्यासाठी लागते रांग, मुंबईतील हे ठिकाण माहितीये?