फडणवीसांचा मॅजिक पॅटर्न सलग तिसऱ्यांदा कायम
10 जुन 2022 ला राज्यसभा तर 20 जुन 2022 ला विधानपरिषदेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला मॅजिक पॅटर्न दाखवला होता. 2022 च्या निवडणुकींचे मुख्य सुत्रधार देवेंद्र फडणवीस यांच्यामुळच महाविकास आघाडी सरकार कोसळलं होतं. यामुळे यंदाही या मतदानाच्या मॅजिक पॅटर्नची संपुर्ण जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच देण्यात आली होती. 2022 च्या धक्कादायक निकालांचा मॅजिक पॅटर्न फडणवीसांनी पुन्हा एकदा खरा करून दाखवला. 2022 ला राज्यसभा आणि विधानपरिषदेत विजयानंतर आज फडणवीसांनी विजयी हॅट्रिक मारली आहे. विधानपरिषेदेच्या गणितांमध्ये फडणवीसांची बेरीज सर्वांवरच भारी पडलेली दिसतेय. सलग 5 टर्म आमदार असणाऱ्या शरद पवार पुरस्कृत उमेदवाराला फडणवीसांकडून धोबीपछाड देण्यात आला.
advertisement
कसा ठरतो मतदानाचा कोटा?
विधानसभेतील एकूण आमदारांची संख्या भागिले विधानपरिषदेतील रिक्त जागांची संख्या अधिक 1 या पद्धतीनं मतदानाचा कोटा ठरतो. राज्यात विधानसभेच्या एकूण जागा 288 आहेत. पण, लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या काही आमदारांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे आता हे संख्याबळ 274 वर आलं आहे. विधानसभेच्या एकूण जागा 274 जागांचा रिक्त जागा 11 +1 म्हणजेच 12 ने भागाकार केला तर 22.833 हे उत्तर येतं. त्यामुळे विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी 23 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे.
वाचा - विधान परिषदेत भाजपची हवा, पंकजा मुंडेंसह आणखी 2 उमेदवार विजयी
पक्षीय बलाबल कसं होतं?
महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप आहे. भाजपाचे 103 आमदार असून अपक्ष आणि मित्रपक्ष मिळून 111 संख्या होते. भाजपानं 5 जणांना उमेदवारी दिली आहे. त्यांचं संख्याबळ पाहात हे सर्व उमेदवार सहज निवडून येतील अशी परिस्थिती आहे. दुसरीकडे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे 38 आमदार आहेत. त्यांना 7 अपक्ष आणि बच्चू कडू यांच्या पक्षाच्या 2 अशा 9 आमदारांचा पाठिंबा आहे. महायुतीतील तिसरा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडे (अजित पवार) 39 आमदार आहेत. राष्ट्रवादीचे 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून मताचा कोटा पूर्ण करण्यासाठी त्यांना 7 आमदारांची गरज होती.
महाविकास आघाडीकचं काय?
काँग्रेसचे 37 आमदार आहेत. या संख्याबळाच्या जोरावर काँग्रेसचा एक उमेदवार नक्की विजयी होईल. त्यानंतरही काँग्रेसकडं 14 मतं शिल्लक राहतील. ही मतं निर्णायक होती. शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा होता. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे 13 आमदार आहेत. तर शेकापचा 1 आमदार आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 1 उमेदवार रिंगणात असून त्यांचे 15 आमदार आहेत. त्यामुळे ठाकरेंचे मिलींद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील यांना मतांची गरज होती.
