पुणे : पुणे शहराच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असतानाच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका व्यापाऱ्याच्या अपहरणाचे नाट्य अवघ्या काही तासांत संपवून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. दीड कोटी रुपयांच्या खंडणीसाठी करण्यात आलेल्या या थरारक अपहरणाचा छडा लावत पोलिसांनी पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
पुण्यातील गजबजलेल्या टिंबर मार्केट परिसरातून एका व्यापाऱ्याचे भरदिवसा अपहरण करून दीड कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेने पाच सराईत गुन्हेगारांना अटक केली असून अपहरण करणाऱ्या व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली आहे. प्रणव बबन निवंगुणे, साहिल श्रीकांत खुटवड, सौरव पवार, शिरीष खोपडे आणि मंदार दारवटकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
advertisement
नेमकं प्रकरण काय?
संबंधित व्यापारी आपल्या कामात व्यस्त असताना टिंबर मार्केट परिसरातून आरोपींनी त्यांचे अपहरण केले. त्यांना जबरदस्तीने गाडीत घालून साताऱ्याच्या दिशेने नेण्यात आले. यानंतर आरोपींनी व्यापाऱ्याच्या पत्नीला फोन करून पतीच्या जीवाच्या बदल्यात 1 कोटी 50 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. खंडणीचा फोन आल्यानंतर घाबरलेल्या कुटुंबीयांनी तत्काळ पुणे पोलिसांकडे धाव घेतली.
पाचही आरोपींना ताब्यात घेऊन व्यापाऱ्याची सुटका
घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखेची विविध पथके सक्रिय झाली. तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींचे लोकेशन साताऱ्याच्या दिशेने असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तातडीने पाठलाग सुरू केला आणि साताऱ्याच्या जवळ सापळा रचून आरोपींच्या गाडीला घेरले. अत्यंत शिताफीने पाचही आरोपींना ताब्यात घेऊन व्यापाऱ्याची सुटका करण्यात आली.
भरवस्तीतून व्यापाऱ्याचे अपहरण झाल्याने शहरात खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एक मोठा अनर्थ टळला आहे. या पाचही आरोपींची पार्श्वभूमी तपासली जात असून, त्यांच्या मागे कोणी मास्टरमाईंड आहे का याचा तपास आता पोलीस करत आहेत.
हे ही वाचा :
