पुण्यात सर्वाधिक ई-वाहनांची विक्री
या राज्यव्यापी यशात पुणे शहराचा वाटा सिंहाचा आहे. मुंबईसारख्या महानगरालाही मागे टाकत पुण्यात सर्वाधिक ई-वाहनांची विक्री झाली आहे. बंगळूरु, सुरत आणि जयपूरसारख्या मोठ्या शहरांनाही पुण्याने मागे टाकले आहे, ज्यामुळे 'ई-वाहन शहर' म्हणून पुण्याची ओळख निर्माण झाली आहे. ई-वाहनांच्या विक्रीत महाराष्ट्र आणि पुणे जरी आघाडीवर असले तरी, तज्ज्ञांच्या मते, उत्पादन कारखान्यांच्या विस्तारात महाराष्ट्र अजूनही हैदराबाद, दिल्ली आणि बंगळूरु या शहरांच्या तुलनेत मागे आहे. संशोधन आणि विक्रीत आघाडी घेतलेल्या महाराष्ट्राला आता उत्पादन क्षेत्रातही लक्षणीय प्रगती करणे आवश्यक आहे.
advertisement
हवेतला प्रवासही स्वस्त होणार
2020 नंतर, कोरोनाच्या लाटेमुळे ई-वाहनांवरील संशोधन वेगाने वाढले आणि 2021 पासून या विक्रीने मागे वळून पाहिलेच नाही. आज दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांसह इलेक्ट्रिक विमानेही विकसित होत असल्याने, भविष्यात हवेतला प्रवासही अधिक परवडणारा होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
पायाभूत सुविधांमुळे ई-वाहनांचा स्वीकार
टियर-1 (Tier-1) शहरातील वाढती जागरूकता आणि आधुनिक पायाभूत सुविधांमुळे ई-वाहनांचा स्वीकार वेगाने होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कर्नाटकात (Karnataka) बंगळूरुने राज्याच्या एकूण ईव्ही विक्रीपैकी 55 टक्के (भारताच्या एकूण 5 टक्के) वाटा उचलला आहे, तर गुजरातमधील (Gujarat) सुरत (25 टक्के) आणि अहमदाबाद (21 टक्के) त्यांच्या राज्याच्या ईव्ही वाट्यात आघाडीवर आहेत. दिल्ली-एनसीआरमध्येही (Delhi-NCR) 37,343 ईव्ही (EV) कार्सची संख्या लक्षणीय आहे.
टेस्ला आणि मर्सिडिजला हवाय महाराष्ट्र
भारतात ई-वाहनांचे उत्पादन 2011 मध्ये 'FAMEHV' (Faster Adoption and Manufacturing of Electric and Hybrid Vehicle) योजनेने औपचारिकरित्या सुरू झाले. 2015 मध्ये 'फेम-1' आणि 2019 मध्ये 'फेम-2' योजना सुरू झाल्याने या क्षेत्राला मोठी गती मिळाली. आता नुकताच 'टेस्ला'ने मुंबईत पहिले स्टोअर उघडून भारतीय बाजारात प्रवेश केला आहे. तसेच, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात घोषणा केली आहे की, मर्सिडिज इलेक्ट्रिक कारचे उत्पादन पुणे जिल्ह्यातील चाकण एमआयडीसीमध्ये करण्यास उत्सुक आहे. यामुळे ईव्ही कार उत्पादकांचे भारताच्या बाजारपेठेकडे अधिक लक्ष वेधले जात आहे.
