पुणे : राज्यातील काही शहरांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरातील प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बदलत चाललेले हवामान, वाढती आर्द्रता, सुरू असलेली बांधकामे आणि दिवाळीनिमित्त उडवले जाणारे फटाके यामुळे मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये प्रदूषणाचा विळखा रविवारपासून अधिक जाणवत आहे. मुंबई आणि नागपूरमध्ये हवेचा दर्जा रविवारी सकाळी मध्यम श्रेणीत नोंदला गेला आहे.
advertisement
पुणे-पिंपरी परिसरात वायूप्रदूषण वाढले
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात वायूप्रदूषणाच्या पातळीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. तापमान 35 अंशांपर्यंत पोहचले आहे.मुंबईत हवेचा दर्जा रविवारी सकाळी मध्यम स्तरावर नोंदवला गेला, तर वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) परिसरात हवा ‘अतिवाईट’ दर्जाची असल्याचे निरीक्षण झाले. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, पुणे परिसरातील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) दुपारी 305 पर्यंत पोहोचला. विशेषतः वाकडमधील भूमकर चौकात प्रदूषणाची पातळी उंच असल्याचे नोंदले गेले.
नागपूर शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक 100 च्याही आत असतो. परंतु रविवारी नागपूरचा हवा गुणवत्ता निर्देशांक 200 च्या वर नोंदला गेला. पुढील काही दिवस दिवाळीतील फटाक्यांच्या आतषबाजीमुळे हवेची गुणवत्ता आणखी घसरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हवेची गुणवत्ता प्रमुख ठिकाणी (AQI)
मुंबई: बीकेसी – 301 (अत्यंत वाईट), कुलाबा – 244 (वाईट), देवनार – 207 (वाईट)
पुणे: शिवाजीनगर – 244 (वाईट), पाषाण-पंचवटी – 121 (मध्यम), पुणे विद्यापीठ – 116 (मध्यम)
नागपूर: वाडी – 211 (वाईट), बाबूलखेडा – 175 (मध्यम), सिव्हिल लाईन्स – 167 (मध्यम)
हवेची गुणवत्ता निर्देशांक (AQI) प्रमाणानुसार वेगवेगळ्या स्तरावर मोजली जाते. 0 ते 50 दरम्यानचा AQI चांगली हवा दर्शवतो, तर 51 ते 100 दरम्यान हवा समाधानकारक मानली जाते. 101 ते 200 दरम्यान हवा मध्यम दर्जाची असते. 201 ते 300 दरम्यानची हवा वाईट असून, 301 ते 400 दरम्यान ती अत्यंत वाईट मानली जाते. 400 पेक्षा जास्त AQI असलेली हवा अतिधोकादायक ठरते. नागरिकांनी या स्तरानुसार योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.