प्रवासाचा वेळ ३० मिनिटांनी वाचणार: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर सध्या दिवसाला सुमारे ६५ हजार वाहने धावतात, ज्यामुळे लोणावळ्याजवळील घाट परिसरात मोठी वाहतूक कोंडी होते. ही अडचण दूर करण्यासाठी २०१९ मध्ये खोपोली ते कुसगाव दरम्यान १९.८० किमी लांबीच्या 'मिसिंग लिंक'चे काम हाती घेण्यात आले होते. या मार्गिकेमुळे प्रवासाचे अंतर ६ किलोमीटरने आणि वेळ ३० मिनिटांनी कमी होणार आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पात आशियातील सर्वाधिक रुंदीच्या बोगद्यांचा समावेश आहे.
advertisement
अनेक तारखा हुकल्या, आता नवा मुहूर्त: या प्रकल्पाचे काम मूळ नियोजनानुसार २०२२ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, तांत्रिक आव्हाने आणि भौगोलिक अडचणींमुळे प्रकल्पाला विलंब झाला. डिसेंबर २०२२ पासून ते मार्च २०२६ पर्यंत अनेक तारखा जाहीर करण्यात आल्या, पण काम पूर्ण होऊ शकले नाही. आता मात्र प्रकल्पाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून, एप्रिलमध्ये लोड टेस्ट आणि सुरक्षा प्रमाणपत्र मिळवल्यानंतर महाराष्ट्र दिनी (१ मे) या मार्गिकेचे लोकार्पण करण्याचे निश्चित झाले आहे.
एमएसआरडीसीचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर यांनी स्पष्ट केले की, हे काम अत्यंत आव्हानात्मक होते, परंतु आता अंतिम टप्प्यात असल्याने लोकार्पण लांबणीवर जाण्याची शक्यता नाही. या प्रकल्पामुळे घाट परिसरातील वाहतूक कोंडी सुटण्यासोबतच प्रवासाचा सुरक्षितताही वाढणार आहे.
