पुणे: पुण्याच्या मुंढवा कोरेगावमधील सरकारी जमीनीचा पार्थ पवारांच्या कंपनीनं केलेला व्यवहार रद्द करण्याची घोषणा अजित पवारांनी केली. पण, व्यवहार रद्द झाला म्हणजे सुटले असं होणार नाही. एक रुपयाचीही व्यवहार झाला नाही, असं अजित पवार म्हणत आहे, पण तोच व्यवहार रद्द करण्यासाठी पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीला 192 कोटी रुपये भरावे लागणार आहेत. त्यामुळे पवारांच्या अंगलट आलेल्या या प्रकरणाचं गणित काय आहे?
advertisement
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजिव पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीच्या कोरेगावमधील जमीन खरेदीच्या कारनाम्यानं अजित पवारांची चांगलीच कोंडी झाली आहे. त्यामुळं शुक्रवारी अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत, हा खरेदी व्यवहार रद्द करण्याची घोषणा केली.
पण, आता अजित पवारांच्या या भूमिकेनंतर पार्थ पवारांमागील वादमालिका काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. कारण, हा व्यवहार रद्द करण्याची तयारी अमेडिया कंपनीनं केली असली, तरी महसूल विभागानं पार्थ पवारांना दणका देत, अमेडिया एलएलपीला पत्र पाठवून दस्त रद्द करायचा असेल तर 42 कोटी भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्यात 21 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी आणि दस्त करण्यासाठी 21 कोटींचा दंड याचा समावेश आहे.
मुख्यमंत्र्यांनी देखील स्टँप ड्युटी भरल्याशिवाय व्यवहार रद्द होणार नाही, असं म्हणत पार्थ पवारांना मुद्रांक शुल्क भरण्याचा अप्रत्यक्ष सल्ला दिला आहे.
स्टँप ड्युटी भरल्याशिवाय व्यवहार रद्द होणार नाही
पण, हे एवढ्यावरच थांबणार नाही. ही जमीवन महार वतनाची असल्या कारणानं त्या जमिनीच्या हस्तांतरणासाठी नजराणा भरणंही गरजेचं असल्याचं मत माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभारेंनी व्यक्त केलंय. त्यामुळं 21 कोटींच्या स्टॅम्प ड्युटीसोहबतच पार्थ पवारांच्या कंपनीला 150 कोटींचा नजराणा भरावा लागणार आहे.
अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीनं कोरेगाव पार्कमधील ही 40 एकर जमीन 300 कोटींना खरेदी केली होती. पण, त्यासाठी कायद्यांची मोडतोड आणि सरकारी महसूलही बुडवल्याचं उघड झालंय. त्यामुळंच सरकारनं हे याप्रकरण गांभीर्यानं घेतल्याचं दिसतंय. याप्रकरणातील दोषींवर निलंबनाची कारवाई सुरू झालीय.
तसंच अमेडिया कंपनीच्या पार्टनर असलेल्या दिग्विजय पाटवांवरही गुन्हा दाखल झालाय. आता वारे उलटे फिरू लागले, त्यामुळंच व्यवहार रद्द करण्यासाठीही पार्थ यांच्या अमेडिया कंपनीला कोटींचा भूर्दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे पार्थ पवारांसाठी हा प्रकार म्हणजे, 'खाया पिया कुछ नाही, गिलास तोडा बाराअणा' असाच म्हणता येईल.
