मिळालेल्या माहितीनुसार, २९ वर्षीय आरोपी पती शुभम श्रीकांत घोडके हा शहरात पानटपरी चालवतो. शुभम आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत असे, ज्यावरून त्यांच्यात वारंवार खटके उडत होते. २४ मार्च रोजी दुपारी चारच्या सुमारास संशयाचे हे भूत त्याच्या अंगात इतके संचारले की, त्याने तीक्ष्ण हत्याराने पत्नीच्या डोक्यावर, हातावर आणि पायावर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीला शेजाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र गुरुवारी पहाटे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
advertisement
या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. वडिलांच्या संशयी वृत्तीमुळे आईचा जीव गेला आणि वडील आता तुरुंगाची हवा खात आहे, यामुळे या चिमुरड्यांचे छत्र हरपले आहे. मृत महिलेच्या ५० वर्षीय आईने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे कौटुंबिक हिंसाचार आणि वैवाहिक वादात संयम राखणे किती गरजेचे आहे, यावर आता चर्चा होत आहे. मात्र, या धक्कादायक घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे
