पुणे : पुण्यातील कथित रेव्ह पार्टी प्रकरणात अखेरीस राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना कोर्टाने दिलासा दिला आहे. ६० दिवसानंतर कोर्टाने प्रांजल खेवलकर यांना जामीन मंजूर केला आहे. ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे खेवलकर यांचा आता जेलमधून सुटका होणार आहे.
advertisement
पुण्यातील खराडीमध्ये ड्रग्स पार्टी प्रकरणीत एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना दोन महिन्यांपूर्वी नाट्यमयरित्या अटक करण्यात आली होती. या प्रकरणी दोन महिला आणि ५ तरुणांना अटक करण्यात आली होती. एकनाथ खडसे यांचं जावई प्रांजल खेवलकर यांना रेव्ह पार्टी प्रकरणात अटक केल्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना प्रांजल खेवलकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अलीकडेच चाकणकर यांनी खेवलकरांच्या मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये महिलांचे व्हिडीओ आढळले असून पोलिसांना चौकशीची सूचना केली होती.
पण, आज कोठडी संपल्यानंतर पुणे जिल्हा सत्र न्यायालयात प्रांजल खेवलकर यांना हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने खेवलकर यांना जामीन मंजूर केला आहे. ५० हजारांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मिळाला आहे. अटक करण्यात आल्यानंतर प्रांजल खेवलकरांची पोलीस कोठडी संपल्यावर येरवडा जेलमध्ये रवानगी करण्यात आली होती. आता सत्र न्यायालयाने जामीन दिल्यामुळे खेवलकर आता बाहेर येणार आहे.
काय आहे प्रकरण?
पुणे पोलिसांनी खराडी परिसरातील एका फ्लॅटवर छापा टाकून ही रेव्ह पार्टी उधळली होती. या कारवाईत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी पार्टीच्या ठिकाणाहून कोकेन, गांजा यांसारखे अंमली पदार्थ, दारू आणि हुक्का जप्त केलं होतं. तसंच, प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. प्राथमिक अहवालात त्यांनी अल्कोहोलचं सेवन केल्याचं स्पष्ट झालं होतं. ड्रग्सचे सेवन केलं होतं की नाही, हे अद्यापही समोर आलं नाही.
दरम्यान, प्रांजल खेवलकर यांच्यावर मानवी तस्करी आणि मोबाईलमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ/फोटो असल्याचा गंभीर आरोप राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केला होता. तर एकनाथ खडसे यांनी त्यांचा जावई दोषी आढळल्यास त्याला फाशी देण्याची मागणी केली होती, तसंच,हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप करत पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उभे केले होते.