नेमकी घटना काय?
भास्कर मोहन राठोड (वय ५८, मूळ रा. जिंतूर, परभणी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. राठोड हे कामानिमित्त पुण्यात आले होते आणि वाघोलीतील आव्हाळवाडी भागात भाडेतत्त्वावर खोली घेऊन राहत होते. त्यांच्या शेजारीच आनंद रवींद्र वर्मा (वय २६) आणि शीला आनंद वर्मा (वय २४) हे दाम्पत्य वास्तव्यास आहे. काही दिवसांपूर्वी राठोड यांनी विश्वासाने आपले काही गृहोपयोगी साहित्य आणि भांडी वर्मा दाम्पत्याकडे ठेवण्यासाठी दिली होती.
advertisement
वादाचे रूपांतर खुनात
१६ फेब्रुवारी रोजी भास्कर राठोड यांनी आपली भांडी आणि साहित्य वर्मा दाम्पत्याकडे परत मागितले. मात्र, ही क्षुल्लक मागणी वर्मा दाम्पत्याला इतकी झोंबली की त्यांनी राठोड यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि या दाम्पत्याने राठोड यांना अत्यंत निर्दयीपणे बेदम मारहाण केली. या मारहाणीत राठोड यांच्या शरीराला गंभीर जखमा झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दाम्पत्याला अटक
या घटनेनंतर वाघोली पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवून आरोपी आनंद वर्मा आणि शीला वर्मा या दोघांना अटक केली आहे. किरकोळ भांड्यांच्या वादातून एका निष्पाप व्यक्तीचा जीव घेणाऱ्या या दाम्पत्याच्या कृत्यामुळे आव्हाळवाडी परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस उपनिरीक्षक शहादेव शहाळे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
