नेमकी घटना काय?
कात्रजमधील खोपडेनगर परिसरात राहणाऱ्या फिर्यादीच्या मोबाईलवर चोरट्यांनी एक मेसेज पाठवला होता. यामध्ये तुमच्या वाहनावर आरटीओने दंडात्मक कारवाई केली असून त्याचे ई-चलन भरण्यासाठी एक लिंक/फाईल दिली होती. फिर्यादीला हे चलन खरे वाटले आणि त्यांनी माहिती पाहण्यासाठी ती फाईल आपल्या मोबाईलमध्ये उघडली.
अशी झाली फसवणूक: ती फाईल उघडताच सायबर चोरट्यांनी 'रिमोट ॲक्सेसच्या मदतीने फिर्यादीच्या मोबाईलचा ताबा मिळवला. त्यानंतर त्यांचे आधार कार्ड, बँक खात्याचे तपशील आणि इतर गोपनीय माहिती चोरली. या माहितीचा वापर करून चोरट्यांनी फिर्यादीच्या बँक खात्यातून तब्बल २ लाख ६० हजार रुपये परस्पर दुसऱ्या खात्यावर वळवले. पैसे कापले गेल्याचा मेसेज आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले.
advertisement
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्या लिंकचा आणि बँक व्यवहारांचा माग काढण्यास सुरुवात केली आहे. आरटीओ कधीही वैयक्तिक व्हॉट्सॲप किंवा संशयास्पद लिंकद्वारे पैसे भरण्यास सांगत नाही. अधिकृत 'परिवहन' (Parivahan) वेबसाईटवर जाऊनच आपल्या दंडाची खातरजमा करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
