आपल्या मुलासाठी नेहमीप्रमाणे दुचाकीवरून जेवणाचा डबा घेऊन जात असतानाच पुंजाराम मारकड यांच्या दुचाकीला अचानक भरधाव वेगाने आलेल्या पिकअपने धडक दिली. मांडवी बुद्रुक येथील अरुंद पुलाजवळ ही घटना घडली. ही धडक इतकी जोरदार होती की ते उडून खड्ड्यात फेकले गेले आणि दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. यासोबतच चालकाचं नियंत्रण सुटल्यानं पिकअपही उलटून पडली. यात मारकड यांचा जागीच मृत्यू झाला. नितेश गणेश पवार (रा. भिमनगर, कोंढवे धावडे, उत्तम नगर, ता. हवेली) असं पिकअप चालकाचं नाव आहे. घटनेची माहिती मिळताच उत्तमनगर आणि हवेली पोलीस ठाणेचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मुलाचा डबा पोहोच करण्यासाठी निघालेल्या वडिलांवरच काळाने अशा प्रकारे घाला घातल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
advertisement
या अपघातानंतर पुंजाराम मारकड यांच्या मुलाने पोलीस पिकअप चालकाला वाचवण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप केला आहे. यासोबतच अपघातावेळी पिकअप चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोपही मुलाने केला आहे. त्यामुळे चालकाची तातडीने वैद्यकीय तपासणी करून हवेली पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. पिकअप चालकांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून त्याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांनी प्रयत्न करायला हवे होते. मात्र, असं न करता पोलीसच चालकाला वाचवण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप मृताच्या मुलाने केला आहे
