नेमकी घटना काय?
पुण्यातील ही तरुणी सोशल मीडियावरून झालेल्या एका ओळखीपोटी घर सोडून कोल्हापुरात आली होती. संबंधित मित्राने तिला कोल्हापुरात भेटीसाठी बोलावले होते. मात्र गेल्या तीन दिवसांपासून तो तिला चुकीचे पत्ते देऊन तिची फिरवाफिरव करत होता. मंगळवारी दुपारी तो तिला कसबा बावड्यातील एका ठिकाणी भेटणार होता. मात्र तासनतास वाट पाहूनही तो न आल्याने ही तरुणी नैराश्यातून पाटील गल्लीच्या कोपऱ्यावर रडत बसली होती. तिच्याकडे ना पैसे होते, ना संपर्क साधण्यासाठी मोबाईल.
advertisement
हताश अवस्थेत बसलेल्या या तरुणीला पाहून स्थानिक तरुण टिपू मुजावर आणि ओंकार पाटील यांना शंका आली. त्यांनी तिची आस्थेवाईकपणे चौकशी केली. सुरुवातीला घाबरलेल्या या तरुणीचा विश्वास संपादन केल्यानंतर तिने आपली आपबिती सांगितली. मित्राने फसवणूक केल्याचे लक्षात येताच या तरुणांनी तिला आधार दिला आणि तिच्या आईशी संपर्क साधून तिला धीर दिला.
तरुणांनी या घटनेची कल्पना शाहूपुरी पोलीस ठाण्याला दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तरुणीला ताब्यात घेतले. तिचे योग्य समुपदेशन करून तिला अन्नाची आणि चहाची व्यवस्था केली. दरम्यान, पुणे पोलिसांशीही संपर्क साधण्यात आला. मंगळवारी रात्री उशिरा तरुणीचे नातेवाईक कोल्हापुरात पोहोचले आणि रीतसर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तिला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.
एकाकी अवस्थेत असलेल्या तरुणीचा कोणा नराधमाने फायदा घेतला असता तर मोठी दुर्घटना घडली असती, मात्र कोल्हापूरकरांच्या माणुसकीमुळे एक अनर्थ टळला आहे. या घटनेने पुन्हा एकदा सोशल मीडियावरील अनोळखी मैत्रीच्या धोक्यांकडे लक्ष वेधले आहे.
