काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास ससाणेनगर मुख्य रस्त्यावरून मिरवणूक जात होती. रंजना जाधव या घराबाहेर मिरवणूक पाहण्यासाठी आल्या होत्या. डीजेचा आवाज इतका प्रचंड होता की, त्यांच्या छातीत अचानक कळा येऊ लागल्या आणि त्या जागीच कोसळल्या. मिरवणुकीमुळे झालेली वाहतूक कोंडी आणि डीजेचा आवाज यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यास मोठा विलंब झाला. डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले.
advertisement
मृत महिलेचा मुलगा सौरभ जाधव यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. "वारंवार तक्रारी करूनही पोलिसांनी आवाजाच्या मर्यादेकडे दुर्लक्ष केले. वाहतूक कोंडीमुळे आईला वेळेत उपचार मिळाले नाहीत," असे त्यांनी सांगितले. दुसरीकडे, काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी हे आरोप फेटाळले आहेत. "महिलेची आधीच बायपास सर्जरी झाली होती आणि त्यांना डायलिसिस सुरू होते. डीजे बंद झाल्यानंतर ही घटना घडली असून आम्ही डीजेला परवानगी दिली नव्हती," असे त्यांनी स्पष्ट केले.
ध्वनीप्रदूषणामुळे मानवी हृदयावर आणि श्वसनसंस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. या घटनेमुळे आता शहरातील मंडळांच्या आवाजाच्या मर्यादेवर पुन्हा एकदा वादंग निर्माण झाले आहे.
