काय आहे रेल्वेचा 'हाय-स्पीड' प्लॅन?
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा केली जात आहे. यामध्ये प्रामुख्याने ओव्हरहेड कॅटेनरी आणि संपर्क तारा बदलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रेल्वेच्या खांबांवर आता 'ऑटोमेटेड टेन्शनिंग डिव्हाइसेस' (ATDs) बसवले जात आहेत. यामुळे उन्हाळा असो वा पावसाळा, तारांवर एकसमान ताण राहील, ज्यामुळे तांत्रिक बिघाड कमी होतील. पुणे-लोणावळा दरम्यानच्या १५२ ट्रॅक किलोमीटरपैकी १३२ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम जून २०२६ पर्यंत संपणार आहे.
advertisement
प्रवाशांना नेमका काय फायदा?
वेग वाढल्यामुळे प्रवाशांच्या एकूण प्रवासात ४ ते ५ मिनिटांची बचत होईल. हे ऐकायला कमी वाटत असले तरी, यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकात मोठी सुधारणा होईल आणि गाड्यांना होणारा विलंब कमी होईल. याचा सर्वाधिक फायदा डेक्कन क्वीन, सिंहगड एक्सप्रेस आणि इंटरसिटी एक्सप्रेस यांसारख्या महत्त्वाच्या गाड्यांना होणार आहे. पुणे-लोणावळा टप्प्यात वेग वाढल्याने पर्यायाने पुणे-मुंबई प्रवासाचा वेळही कमी होण्यास मदत होईल.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून हे काम प्रामुख्याने रविवारी मेगाब्लॉक घेऊन केले जात आहे. लवकरच पुणेकर अधिक वेगवान आणि सुरक्षित प्रवासाचा आनंद घेऊ शकणार आहेत.
