अखेर प्रतीक्षा संपली, पुणे-मिरज रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण पूर्ण
पुणे-मिरज दुहेरी मार्गावरून सध्या दिवसाला फक्त सहा एक्प्रेस व तीन पॅसेंजर धावत असल्याने प्रवासी गाड्यांची संख्या वाढविण्याची मागणी आहे. मध्य रेल्वेने पुणे-मिरज या 279 किलोमीटर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण व विदयुतीकरणाचे काम 2016 मध्ये सुरू केले होते. हे काम मे 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. या प्रकल्पासाठी पाच हजार कोटी रुपये खर्च मंजूर करण्यात आले.
advertisement
दुहेरीकरणासाठी सातारा आणि पुणे जिल्ह्यात भूसंपादनासाठी शेतकऱ्यांच्या हरकती आणि इतर अडचणींमुळे कामाला वेळ लागला. पुणे ते मिरज दरम्यान वेगवेगळ्या टप्प्यात दुहरीकरण पूर्ण झालेल्या नवीन मार्गावर वेगाच्या चाचणीत जास्तीतजास्त 130 किलोमीटर प्रतितास वेग गाठण्यात आला.
ही चाचणी यशस्वी झाल्याने सुरक्षा आयुक्तांनी या मार्गावरून ताशी 90 किलोमीटर वेगाने गाड्या चालविण्यास मान्यता दिली. कोरेगाव-रहिमतपूर- तारगाव या अंतिम टप्प्यात पूर्ण झालेल्या मार्गाची रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा सुरक्षा तपासणी करणार आहेत. सुरक्षा आयुक्त प्रथम ट्रॉलीवरून प्रवास करतील. त्यानंतर आठ डब्यांची विशेष रेल्वे कोरेगाव ते तारगाव या 23 किलोमीटर मार्गावर प्रतितास 60 ते 100 किलोमीटर गतीने धावणार आहे.
सध्याच्या मार्गावर कोयना, महालक्ष्मी, महाराष्ट्र, चालुक्य, गोवा एक्स्प्रस, कोल्हापूर-पुणे एक्प्रेस, काही विशेष एक्स्प्रेस आणि पाच पॅसेंजर गाड्या दररोज धावतात. दुहेरीकरणानंतर या मार्गाची क्षमता मोठी झाल्याने या मार्गावर गाड्या वाढविण्याची आणि पुण्यापर्यंत येणाऱ्या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसचा मिरजेपर्यंत विस्तार करण्याची प्रवाशांची मागणी आहे.
पुणे-मिरज मार्गाचे दुहेरीकरण, विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. तरी मिरज-लोंढा या 180 किलोमीटर मार्गाचे दुहेरीकरण-विद्युतीकरण यापूर्वच पूर्ण झाले आहे. यामुळे या मार्गावरून दिवसाला शंभरवर गाड्या धावण्याची क्षमता आहे. पुणे-हुबळी-पुणे, कोल्हापूर वंदेभारत एक्स्प्रेसचाही वेग वाढणार आहे. यामार्गाने दक्षिण आणि उत्तर भारतात गाड्या जाऊ शकतात. त्यामुळे दुहेरी मर्गावर गाड्या वाढवाव्यात मालवाहतुकीसाठीही रेल्वे स्थानकांचा विकास करावा अशी विनंती रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य सुकुमार पाटील यांनी केली
