पुरंदर विमानतळामुळे पुणे व परिसरातील औद्योगिक विकासाला चालना मिळेल. हे केवळ प्रवासी विमानतळ न राहता कार्गो विमानतळही असणार असल्याने नाशवंत मालाच्या व्यापारासाठी ते विशेष उपयुक्त ठरणार आहे. या प्रकल्पामुळे पुरंदर तालुका आणि परिसरातील नागरिकांना मोठा लाभ होईल. तसेच पुणे जिल्ह्याच्या एकूण जीडीपीमध्ये किमान दोन टक्क्यांनी वाढ होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
advertisement
पुण्याची तहान भागवण्यासाठी मोठा निर्णय; शहराचा पाणी प्रश्न लागणार मार्गी, मुळशीकडून मिळणार मदत
जमिनीचा मोबदला जास्तीत जास्त देणार
पुरंदर विमानतळ प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या सात गावांतील ग्रामस्थांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला. पुरंदर येथील विमानतळ महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. विमानतळ प्रकल्प राबवताना सर्व बाबींचा विचार केला जाईल. या प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीसाठी शेतकऱ्यांना योग्य आणि जास्तीत जास्त मोबदला देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
अल्पभूधारक व भूमिहीनांचा विचार
प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या पुनर्वसनात कुटुंबाची रचना लक्षात घेतली जाणार आहे. कुटुंबातील सज्ञान मुलांसाठी अतिरिक्त जागा देण्यात येणार असून, बहिणींच्या हिश्याबाबतही योग्य तो मार्ग काढला जाईल. अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतकऱ्यांसाठी वेगळे पर्याय देता येतील का, याचाही विचार करण्यात येणार आहे. पुरंदर विमानतळासाठी संपादित होणाऱ्या जमिनीसाठी मोबदल्यासोबतच पर्यायी जमीन देण्यात येणार असून, असा उपक्रम राज्यात प्रथमच राबवला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पुरंदर विमानतळ प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकरी व नागरिकांच्या पुनर्वसनाला प्राधान्य दिले जाणार आहे. जमिनीचा मोबदला मूळ दरापेक्षा अधिक देण्यासाठी शेतकऱ्यांशी चर्चा करून दर ठरवला जाणार आहे. सिडको प्रकल्पापेक्षा अधिक लाभ देण्याचा प्रयत्न विमानतळ प्रकल्पात केला जाणार आहे.






