उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरटीओने या भागात एक अतिरिक्त पथक वाढवले आहे. खेडशिवापूर टोल नाका ते नवले पूलदरम्यान गेल्या केवळ पंधरा दिवसांत वाहतूक नियम मोडणाऱ्या तब्बल ८२४ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
advertisement
आरटीओच्या वायुवेग पथकांद्वारे ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. एक पथक खेडशिवापूर टोल नाक्यावर थांबून जड वाहनांची कसून तपासणी करत आहे, तर दुसरे पथक संपूर्ण महामार्गावर सतत गस्त घालून नियमभंग करणाऱ्यांवर तत्काळ दंडात्मक कारवाई करत आहे. हेल्मेट व सीट बेल्टचा वापर, वाहनाचा वैध विमा, फिटनेस प्रमाणपत्र, ब्रेक-लाईटची स्थिती आणि वेगमर्यादा पाळणे तसेच मोबाइलवर बोलत वाहन चालविणे यांसारख्या गंभीर उल्लंघनांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
या कारवाईत अनेक वाहनचालकांकडून मोठ्या प्रमाणात नियमभंग होत असल्याचे दिसून आले. यामध्ये हेल्मेट न वापरणारे (८५), सीट बेल्ट न वापरणारे (२६), चुकीचे पार्किंग करणारे (११३), विमा कालबाह्य असलेले (९५), मोबाइलवर बोलणारे (४७), ब्रेक लाईट व दिव्यांमध्ये बिघाड असलेले (४७) तसेच फिटनेस प्रमाणपत्र नूतनीकरण न करता वाहन चालवणारे (८९) यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, वाहनांमध्ये अनधिकृत फेरबदल करणे, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणे, ट्रिपल सीट प्रवास, फॅन्सी नंबर प्लेट, काळ्या काचा, ध्वनी प्रदूषण आणि अवैध पार्किंग यांसारख्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात आली. अनेक प्रकरणांमध्ये चालकांना दंड आकारण्यात आला असून, काही नियमांचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर जप्तीची कारवाई देखील करण्यात आली आहे.
नवले पूल परिसरातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे. वाहनचालकांच्या बेफिकीरीमुळे निरपराधांचे प्राण जात असल्याने, ही मोहीम पुढील काळात अधिक कडकपणे राबविण्यात येणार असल्याचे आरटीओने स्पष्ट केले आहे.
