नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री नऊच्या सुमारास एका अज्ञात वाहनातून महामार्गावर मोठ्या प्रमाणात ऑइल (तेल) सांडले होते. अंधार असल्याने दुचाकीस्वारांना रस्त्यावर पसरलेला तेलाचा थर लक्षात आला नाही. परिणामी, वेगात येणाऱ्या दुचाकी या ऑइलवरून घसरून थेट रस्त्यावर आपटल्या. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र अनेक दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाले असून वाहनांचे हेडलाईट आणि इंडिकेटर तुटल्याने मोठे नुकसान झाले आहे.
advertisement
नागरिकांचा संताप आणि प्रशासनाची धावपळ
या घटनेनंतर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही वाहनचालकांनी प्रसंगावधान राखून गाड्या थांबवल्या, तर काहींनी आपली वाहने ढकलत सुरक्षित रस्ता पार केला. स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर रस्त्यावर वाळू टाकून ऑइल स्वच्छ करण्यात आले आणि वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
"एवढ्या मोठ्या प्रमाणावर ऑइल सांडले असताना प्रशासकीय यंत्रणा वेळेवर का पोहोचली नाही?" असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक करत आहेत. अशा बेजबाबदार वाहनचालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
