चाकण आणि तळेगाव एमआयडीसी औद्योगिक पट्ट्यात देशातील नामांकित कंपन्या आणि उद्योग कार्यरत आहेत. त्यामुळे या परिसरात दररोज हजारो कामगार व कर्मचारी कामासाठी ये-जा करतात. त्याचबरोबर मालवाहू ट्रक, कंटेनर वाहने आणि खासगी वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. परिणामी वारंवार वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. ही समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने वाहतूक तज्ज्ञांच्या सहाय्याने एक व्यापक वाहतूक सुधारणा आराखडा तयार केला आहे.
advertisement
बाणेर-शिवाजीनगर गाठा सुसाट! दुमजली उड्डाणपूल लवकरच वाहतुकीसाठी खुला, मुहूर्त कधी?
या गोष्टींची सुधारणा करण्यात येणार
या आराखड्यानुसार प्रमुख मार्गांचे रुंदीकरण, अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती, सेवा रस्त्यांची उभारणी तसेच राष्ट्रीय व राज्य महामार्गांना जोडणाऱ्या मार्गांचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. काही ठिकाणी चार ते सहा पदरी रस्ते विकसित केले जाणार असून, जड वाहनांसाठी स्वतंत्र मार्गांची योजना आखण्यात आली आहे.
यासोबतच, वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या चौकांचे पुनर्रचना काम हाती घेण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सिग्नल यंत्रणा बसवण्यात येणार असून, वाहतूक नियंत्रणासाठी विविध पूरक उपाय राबवले जाणार आहेत. पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचू नये यासाठी सशक्त ड्रेनेज व्यवस्था उभारण्यावर विशेष भर देण्यात येईल. तसेच अपघातांचे प्रमाण जास्त असलेल्या ठिकाणी उड्डाणपूल किंवा ग्रेड सेपरेटर उभारण्याचा प्रस्ताव देखील आहे.
वाहतूक कोंडीसह इंधनाची बचत
एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी निधी मंजूर करण्यात आला असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे कामांना लवकरच सुरुवात होणार आहे. या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होईल. वाहनांचा वेळ वाचेल आणि इंधनाचीही बचत होईल. यासोबतच प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. रस्ते आणि वाहतूक सुधारल्यामुळे उद्योगांचे काम अधिक सुरळीत होईल. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली चाकण–तळेगाव परिसरातील वाहतूक कोंडीपासून नागरिकांची सुटका होणार आहे.






