नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी अंजुम कुरेशी या त्यांच्या घरी स्वयंपाकघरात काम करत होत्या. सोसायटीमध्ये गेल्या काही काळापासून पाण्याची मोठी समस्या असल्याने रहिवाशांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. याच दरम्यान, अंजुम या स्वयंपाकघरातील ओट्याजवळ खुर्चीवर उभ्या राहून पाण्याच्या टाकीतून पाइप काढण्याचा प्रयत्न करत होत्या.
त्यावेळी अचानक खुर्ची सरकल्याने त्यांचा तोल गेला आणि त्या ओट्यावर जोरात आदळल्या. हा मार इतका भीषण होता की, त्यांच्या मानेला गंभीर इजा झाली आणि त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. काहीतरी पडल्याचा मोठा आवाज आल्याने त्यांची मुलगी धावत स्वयंपाकघरात आली असता तिला आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली.
advertisement
पाण्याच्या समस्येने घेतला बळी?
सोसायटीमधील पाणीटंचाईमुळे रहिवाशांना अशा प्रकारे पर्यायी व्यवस्था करावी लागते, ज्यातून ही दुर्घटना घडल्याचे समोर येत आहे. मुलगी आणि आई घरात असतानाच हा प्रकार घडला. मुलीने आरडाओरडा केल्यानंतर शेजाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली आणि तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले.
पोलीस तपास सुरू
येरवडा पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून प्रथमदर्शनी हा अपघात असल्याचे दिसत आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अहवाल आल्यानंतर हा अपघात होता की घातपात, यावर अधिक प्रकाश पडेल, असे पोलिसांनी सांगितले. सध्या लक्ष्मीनगर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची (ADR) नोंद केली आहे.
