हा सोहळा पारंपरिक भक्तीभाव, सांस्कृतिक अभिमान आणि राष्ट्रभक्तीचा संगम ठरला. संपूर्ण मैदानात घुमणाऱ्या शंखनादाने वातावरण नादमय झाले आणि उपस्थितांनीही या क्षणाचा साक्षीदार होण्याचा आध्यात्मिक अनुभव घेतला. सोहळ्याची सुरुवात ब्रह्मनाद या नादाने झाली, ज्यातून मानवी जीवन आणि परमात्मा यांच्यातील नात्याची आध्यात्मिक जोड प्रकट झाली. त्यानंतर सप्तखंड, अर्धवलय, तुतारी, पूर्णवलय, सुदर्शन आणि मुक्तछंदनाद अशी सात आवर्तने सादर करण्यात आली.
advertisement
अर्धवलय नाद पृथ्वीच्या पाताळातील भागाचे प्रतीक मानला जातो, तर तुतारी नाद च्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. पूर्णवलय आणि सुदर्शन आवर्तनांनंतर मुक्तछंदनाद या सातव्या आवर्तनाने मुक्त नादाच्या माध्यमातून एकात्मतेचा संदेश दिला. सातही नादांच्या माध्यमातून पृथ्वीवरील सात खंड, पाताळातील अर्धा भाग आणि विश्वाच्या आध्यात्मिक एकात्मतेचे दर्शन घडले.
या पथकाचा प्रवासही तेवढाच प्रेरणादायी आहे. केशव शंखनाद पथकाची सुरुवात 2017 साली केवळ 4 ते 5 शंखवादकांपासून झाली होती. आज या पथकात 4500 हून अधिक शंखवादक कार्यरत आहेत. विशेष म्हणजे, 90 टक्के सहभाग महिलांचा असून वय वर्ष 6 ते 84 दरम्यानच्या व्यक्ती या पथकात सक्रीय आहेत. या माध्यमातून महिलांनी पारंपरिक शंखवादनकलेत आपले योगदान सिद्ध केले आहे.
या ऐतिहासिक उपक्रमाचे प्रमुख तसेच केशव शंख नाद पथकाचे अध्यक्ष नितीन महाजन यांनी सांगितले की, हा सोहळा विविध ऐतिहासिक आणि संतपरंपरेशी जोडलेल्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750 व्या जयंती वर्ष, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठगमनाला 375 वर्ष, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 351 वर्ष, राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या 300 व्या जयंती आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या 135 व्या पुण्यतिथी वर्ष तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त हा सोहळा साजरा करण्यात आला.
या विश्वविक्रमासाठी मागील एक वर्षांपासून मोठी तयारी करण्यात आली होती. महाराष्ट्रभरातून तसेच पुणे महानगरातील विविध भागांतून शंखवादकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. पारंपरिक वेशभूषा, भक्तीमय वातावरण आणि एकत्रित नादमयता यामुळे उपस्थितांना अद्वितीय आध्यात्मिक अनुभव मिळाला.
या भव्य सोहळ्याने केवळ विश्वविक्रमच प्रस्थापित केला नाही, तर भारतीय संस्कृतीतील नादयोग, भक्ती आणि शौर्य परंपरेचा जागतिक स्तरावर नवा संदेश दिला. केशव शंखनाद पथकाने आपल्या साधनेतून एकतेचा, श्रद्धेचा आणि संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाचा मंत्र पुन्हा एकदा जगासमोर मांडला.