अयोध्या, 28 ऑगस्ट : भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सण असलेला रक्षाबंधनाचा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. रक्षाबंधन हे भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे. दिवाळी भाऊबीजेनंतर हा दुसरा मोठा सण मानला जातो. पण तुम्हाला माहितीए का, रक्षाबंधनाची सुरुवात कधी आणि कशी झाली? पुराणात वर्णन केलेल्या कथा पाहिल्या तर एक प्रसिद्ध अशी कहाणी आहे. या, पौराणिक कथेनुसार रक्षाबंधनाची सुरुवात पती-पत्नीने झाली, असे मानले जाते.
advertisement
भविष्य पुराणानुसार, एकदा राक्षस आणि देवांमध्ये भयंकर युद्ध सुरू होते. त्या काळात देवांच्या सेनेवर राक्षसांची सेना ही भारी पडू लागली. त्यामुळे देवांच्या सेनेचा राक्षसांच्या सेनेकडून पराभव होऊ लागला होता. हे सर्व दृश्य पाहून देवराज इंद्राची पत्नी शची घाबरू लागली होती. बराचवेळ विचार केल्यानंतर शचीने कठोर तपश्चर्या केली. ही कठोर तपश्चर्या केल्यानंतर त्यांना एक रक्षासूत्र मिळाले. शचीने हे रक्षासूत्र इंद्राच्या मनगटावर बांधले. त्यानंतर देवांची शक्ती वाढली आणि देवांनी राक्षसांचा पराभव करत युद्धात विजय मिळवला.
अनेक कथा रक्षाबंधनाशी संबंधित -
अयोध्यातील प्रसिद्ध ज्योतिषाचार्य पंडित कल्कि राम सांगतात की, जेव्हा इंद्राची पत्नी शचीने इंद्राला रक्षासूत्र बांधले, तेव्हा त्या दिवशी श्रावण पौर्णिमा होती. त्यामुळे या दिवसापासून रक्षाबंधनाची परंपरा सुरू झाली. इतकेच नाही तर रक्षाबंधनाच्या परंपरेबाबत धार्मिक ग्रंथांमध्येही अनेक कथा प्रचलित आहेत. यामध्ये महाभारतातील काही घटनांचा संदर्भ रक्षाबंधनाशी जोडला गेलेला दिसतोय.
उदाहरणार्थ, जेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांच्या सुदर्शन चक्राने शिशुपालाला मारले, तेव्हा द्रौपदीने साडीचा काही भाग फाडून फाडून श्रीकृष्णाच्या हातात बांधला. तेव्हापासून रक्षाबंधनाला सुरुवात झाली, असेही सांगितले जाते.
(सूचना: या बातमीत दिलेली सर्व माहिती आणि तथ्ये गृहितकांवर आधारित आहेत. न्यूज18 लोकल या कोणत्याही तथ्याची पुष्टी करत नाही.)