छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड गावातील शेतकरी एकनाथ लेंभे यांनी दोन एकर शेतीमध्ये टरबूजाची लागवड केली होती. टरबूज पिकासाठी बियाणे, खत, औषधे, पाणी व्यवस्थापन तसेच मजुरी यासाठी त्यांना सुमारे एक लाख रुपयांहून अधिक खर्च करावा लागला. चांगला भाव मिळेल या आशेने त्यांनी मोठ्या मेहनतीने हे पीक घेतले.
advertisement
हंगामाच्या सुरुवातीला बाजारात टरबूजाला 22 रुपये किलो दर मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र आखाती देशांमध्ये युद्धस्थिती निर्माण झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम झाला आणि टरबूजाची निर्यातही ठप्प झाली. त्याचा परिणाम थेट स्थानिक बाजारावर झाला असून टरबूजाचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत.
सध्या टरबूजाला केवळ सात ते आठ रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे. या दरात उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. यावर्षी एकनाथ यांना या सर्व शेतीमध्ये सात ते आठ लाख रुपये एवढा नफा मिळणार होता, पण युद्धामुळे तो नफा आता दोन ते तीन लाख रुपयांवर आलेला आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम आता शेती क्षेत्रावर होत असल्याचे चित्र दिसून येत असून टरबूज उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत आहेत.





