तोट्यात जाणाऱ्या शेतीला आधुनिक पद्धतीनं पिकवलं, 60 लाखांचा झाला नफा, अनुराग यांनी कसा केला यशस्वी प्रयोग?
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
वडिलोपार्जित शेती तोट्यात जात असताना त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रिय पद्धती आणि थेट विक्री व्यवस्थेचा अवलंब करून 1 लाखांच्या नफ्याला तब्बल 50 ते 60 लाखांपर्यंत नेले आहे.
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील वरूड आणि मोर्शी तालुका संत्रा पिकासाठी प्रसिद्ध आहे. या भागातील बहुतांश शेतकरी संत्रा पिकावर अवलंबून आहेत. त्यापैकीच वरूड येथील प्रयोगशील शेतकरी अनुराग यावलकर यांनी शेतीत विविध प्रयोग करत मोठे यश मिळवले आहे. वडिलोपार्जित शेती तोट्यात जात असताना त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रिय पद्धती आणि थेट विक्री व्यवस्थेचा अवलंब करून 1 लाखांच्या नफ्याला तब्बल 50 ते 60 लाखांपर्यंत नेले आहे.
अनुराग यावलकर यांनी लोकल 18 शी संवाद साधताना सांगितले की, लहानपणापासून शेतीची विशेष आवड नव्हती. मात्र वडिलांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना शेतीकडे वळावे लागले. त्यांच्या कुटुंबाकडे 27 एकर वडिलोपार्जित शेती असून त्यात प्रमुख पीक संत्र्याचे आहे. त्यांनी एमसीएपर्यंत शिक्षण घेतले असून पुण्यात शिक्षण आणि नोकरी केली. त्यानंतर नागपूरमध्ये मित्रासोबत कंपनीही सुरू केली. परंतु वडिलांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना गावी परत यावे लागले.
advertisement
सुरुवातीला ते फक्त वडिलांसोबत शेतात जात होते. काही काळानंतर शेतीची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आली. सुरुवातीला शेतीत मन लागत नव्हते, कारण शेती हा कमी दर्जाचा व्यवसाय असल्याची मानसिकता होती. मात्र रोज शेतात जाऊन काम करताना शेतीशी त्यांची नाळ जुळत गेली आणि त्यांनी शेतीतील प्रत्येक गोष्ट समजून घेण्यास सुरुवात केली.
advertisement
मार्गदर्शन आणि मेहनतीतून बदल
त्या काळात शेती पूर्णपणे तोट्यात होती. जवळपास 10 लाख रुपये खर्च करूनही हाती फक्त 1 ते 1.5 लाख रुपये मिळत होते. अशा परिस्थितीत मोर्शी येथील माजी कृषी अधिकारी राठी सर यांचे मार्गदर्शन आणि स्वतःची मेहनत यांच्या जोरावर त्यांनी शेतीत बदल करण्यास सुरुवात केली.
आधुनिक आणि प्रयोगशील शेती
पारंपरिक शेतीपद्धतीत बदल करून त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रिय व्यवस्थापन आणि थेट विक्री व्यवस्थेचा अवलंब केला. संत्रा बागेच्या माध्यमातून त्यांनी एकात्मिक शेतीचा प्रयोग राबवला असून त्यांच्या शेतीला जणू प्रयोगशाळेचे स्वरूप आले आहे. विविध प्रयोग आणि तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आता अनेक शेतकरी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहेत.
advertisement
संत्रा प्रक्रियेसाठी आधुनिक व्यवस्था
संत्रा उत्पादनासाठी त्यांनी आधुनिक पद्धतींचा अवलंब केला आहे. संत्र्यांची निवड, वर्गीकरण आणि पॅकिंग यासाठी विशेष यंत्रणा उभारली आहे. शेतातच ग्रेडिंग आणि पॅकिंग केल्यामुळे संत्र्यांची गुणवत्ता टिकून राहते आणि उत्पादन थेट बाजारपेठेत पाठवणे सोपे होते.
एकात्मिक आणि सेंद्रिय शेतीवर भर
शेतीत रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय आणि जैविक पद्धतींना प्राधान्य दिले जात आहे. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर, पिकांचे विविधीकरण आणि नैसर्गिक पद्धतींचा अवलंब केला जातो. त्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता सुधारते आणि पर्यावरणाचे संरक्षणही होते.
advertisement
शाश्वत सिंचन व्यवस्थेचा वापर
शेतातील पिकांना वर्षभर पुरेसे पाणी मिळावे यासाठी शाश्वत सिंचन व्यवस्था उभारण्यात आली आहे. पाण्याचा कार्यक्षम वापर होण्यासाठी ठिबक सिंचनासारख्या आधुनिक पद्धतींचा वापर केला जातो. त्यामुळे पाण्याची बचत होते आणि पिकांची वाढ चांगली होते.
तंत्रज्ञानामुळे वाढली कार्यक्षमता
शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध कामे अधिक सुलभ करण्यात आली आहेत. संत्र्यांचे वर्गीकरण, स्वच्छता आणि पॅकिंग यासाठी यंत्रसामग्रीचा वापर केला जातो. त्यामुळे वेळेची बचत होते आणि उत्पादन अधिक व्यवस्थितपणे बाजारात पाठवता येते.
advertisement
थेट ग्राहक विक्रीवर भर
शेतमालाची विक्री थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची पद्धत त्यांनी अवलंबली आहे. त्यामुळे मध्यस्थांची साखळी कमी होते आणि शेतकऱ्यांना अधिक चांगला दर मिळतो. ग्राहकांनाही ताजे आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळत असल्याने या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
नफ्यात मोठी वाढ
27 एकर शेतीत सुरुवातीच्या तीन वर्षांत फक्त 1 ते 6 लाख रुपयांच्या दरम्यान नफा मिळत होता. मात्र आता संत्रा, फळबाग आणि भाजीपाला यांच्या माध्यमातून एकूण 50 ते 60 लाख रुपयांपर्यंत निव्वळ नफा मिळत आहे.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
Mar 12, 2026 7:30 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
तोट्यात जाणाऱ्या शेतीला आधुनिक पद्धतीनं पिकवलं, 60 लाखांचा झाला नफा, अनुराग यांनी कसा केला यशस्वी प्रयोग?






