मंदिरात 3,201 शिवलिंग, 12 ज्योतिर्लिंग
मंदिराचे पुजारी युवराज यांनी सांगितलं की, या शिवमंदिराच्या उभारणीमागे एक अद्भुत इतिहास दडलेला आहे. चिखली परिसरातील साईराम बाबा यांनी बंगला बांधण्यासाठी सुमारे तीन गुंठे जागा खरेदी केली होती. बांधकामासाठी पाया खोदण्याचे काम सुरू असताना त्या ठिकाणी वारूळ आढळले. ते हटवताना आतमध्ये छोटी महादेवाची पिंड सापडली. ही घटना दैवी संकेत मानत साईबाबा यांनी त्या ठिकाणी मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला. युवराज यांच्या मते, त्यानंतरही या परिसरात अनेक आश्चर्यचकित करणाऱ्या आणि अद्भुत घटना घडल्या. याच अनुभूतीतून येथे तब्बल 3201 शिवपिंडी आणि बारा गुप्त ज्योतिर्लिंगांची स्थापना करण्यात आली. त्यामुळे आज हे मंदिर भाविकांसाठी श्रद्धा आणि विश्वासाचे केंद्र बनलं आहे.
advertisement
या परिसरात केवळ 3201 शिवपिंडींची स्थापना करण्यात आलेली नाही, तर राम दरबार, हनुमान मंदिर, संतोषी माता मंदिर, दर्गा, गणपती मंदिर, विष्णू मंदिर आणि साई मंदिर अशी विविध धार्मिक स्थळे उभारण्यात आली आहेत. त्यामुळे एकाच ठिकाणी विविध देवतांचे दर्शन घेण्याची संधी भाविकांना मिळते.
मंदिर प्रशासनाच्या संकल्पनेनुसार भविष्यात या संपूर्ण परिसराला शिवशक्तीपीठ म्हणून विकसित करण्याचा मानस आहे. याठिकाणी महादेवाच्या पिंडींचे दर्शन घेतल्यानंतर भक्तांना साक्षात शिवदर्शन झाल्याची आध्यात्मिक अनुभूती मिळते, असे भाविक सांगतात. महाशिवरात्री आणि श्रावणातील सोमवारी याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात्र केवळ उत्सव काळातच नव्हे, तर वर्षभर भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. नवसाला पावणारं मंदिर म्हणूनही या मंदिरांची ख्याती आहे.





