भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल सुरू असलेल्या या वादावर भारताचे महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारत-पाकिस्तान मॅच खेळवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असं सुनिल गावसकर म्हणाले आहेत. आज तक सोबत बोलताना गावसकर यांनी हे वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले सुनिल गावसकर?
'आता याबद्दल बोलून काही फरक पडणार नाहीये, कारण सरकारने ठरवलं आहे की मॅच झाल्या पाहिजेत. बहुपक्षीय स्पर्धेत भारतीय टीम खेळेल, पण द्विपक्षीय सीरिज खेळणार नाही, हा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. त्यामुळे तुम्ही-आम्ही काहीही म्हणालो तरी फरक पडणार नाही. सरकार जे म्हणत आहे, ते खेळाडू आणि बीसीसीआयला मानलं पाहिजे. मी सगळ्यांच्या भावना समजू शकतो. सरकारने निर्णय घेतला आहे, म्हणून स्पर्धेत भारत-पाकिस्तान मॅच होत आहे', असं गावसकर म्हणाले आहेत.
advertisement
ठाकरे- ओवेसींचा सरकारवर निशाणा
दुसरीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भारत-पाकिस्तान सामन्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्यावतीने राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये ‘माझं कुंकू-माझा देश’ आंदोलन पुकारण्यात आलं. पहलगाममधील 26 भगिनींचे कुंकू पुसलं गेलं, त्यानंतर ऑपरेशन सिंदूर मोहीम केली. ही कारवाई अजूनही सुरू असताना पाकिस्तानसोबत सामना कसा काय? असा सवाल ठाकरे गटाने केला आहे.
देशातील मुस्लिमांना धडा शिकविण्याची भाषा इथले राजकारणी वारंवार बोलून दाखवतात. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे द्वेषपूर्ण भाषा वापरतात. मला त्यांना विचारायचंय, नेहमी देशभक्तीच्या बाता मारता, मग आता आपला शत्रू पाकिस्तानविरोधात क्रिकेट सामना होत असताना तुमची देशभक्ती कुठे जाते? देशभक्तीच्या बाता करणाऱ्यांनो'चुल्लू-भर पानी में डूब मरो' असा संताप ओवैसी यांनी व्यक्त केला.