न्यूझीलंडविरुद्धची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये
गेल्या वर्षी घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध झालेला 3-0 असा दारुण पराभव टीम इंडियासाठी एक मोठा 'धडा' होता आणि त्याची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये, हीच संपूर्ण टीमची भावना आहे, असं भारतीय क्रिकेट टीमचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी स्पष्ट केलं आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या आगामी 2-टेस्ट सिरीजसाठी (IND vs WI Test Series) टीम इंडियाची घोषणा करताना आगरकर बोलत होते. ही सिरीज 2 ऑक्टोबरपासून अहमदाबादमध्ये सुरू होणार आहे.
advertisement
घरच्या मैदानावरच्या चारही टेस्ट महत्त्वाच्या
अजित आगरकर म्हणाले, जागतिक टेस्ट चॅम्पियनशिपमुळे (WTC) आता प्रत्येक टेस्ट मॅच खूप महत्त्वाची बनली आहे. न्यूझीलंडविरुद्ध आमची सिरीज खूपच वाईट झाली होती. कदाचित तो आमच्यासाठी एक 'वेक-अप कॉल' होता. आम्ही बऱ्याच काळापासून घरच्या मैदानावर खूप मजबूत आहोत. काही खराब रिझल्ट्स खूप दिवसांनी आले होते आणि आता आम्हाला ते विसरायचे आहेत. वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या घरच्या मैदानावरच्या या चारही टेस्ट मॅचेस खूप महत्त्वाच्या आहेत, असं अजित आगरकर म्हणाले.
साई सुदर्शनला नंबर 3 चा स्लॉट
क्रिकेट हा एक गेम आहे, त्यामुळे काहीही शक्य आहे, पण न्यूझीलंडविरुद्ध जे झाले ते पुन्हा होऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असं म्हणत त्यांनी साई सुदर्शन याच्यावर मोठं वक्तव्य केलं. टीम इंडियाने ज्या प्रमुख क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले आहे, ते म्हणजे नंबर 3 चा स्लॉट. या जागेवर राहुल द्रविड आणि चेतेश्वर पुजारा या दोन महान खेळाडूंनी प्रदीर्घ काळ जबाबदारी सांभाळली होती. कॉम्बिनेशनमुळे नंबर 3 वर काही बदल करावे लागले होते. पण आता साईने खूप क्षमता दाखवली आहे. तो एक चांगला खेळाडू आहे, हे आम्हाला माहीत आहे. आशा आहे की, आता आम्ही त्याला एका विशिष्ट क्रमांकावर दीर्घकाळ संधी देऊ शकू, असं आगरकर म्हणाले आहेत.
विराट कोहलीचा वारसदार शोधला
दरम्यान, विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर टीम भविष्याचा विचार करत असल्याने, नंबर 3 साठी एक दीर्घकालीन पर्याय शोधण्यास उत्सुक आहे. आणि सध्या हा शोध साई सुदर्शन (Sai Sudharsan) याच्यावर थांबला आहे. निवड समितीला आशा आहे की, तो त्यांच्या विश्वासाला पात्र ठरेल.